उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत. कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना डिवचण्यासाठी कोल्हे यांनी हा वाद ओढून घेतला असला तरी शिरुर लोकसभा मतदारसंघासह याचे राज्यात पडसाद उमटू शकतात.
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा वाद एवढा शिगेला पोहचलाय की कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर भाष्य केले आहे.
नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन शनिवारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र, त्यापूर्वीच शुक्रवारी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकले. ‘हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचे भूमीपूजन केले होते. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुरघोडी केली आहे.