मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची धोरणे आपल्याला 2019 च्या निवडणुकांमध्येच लक्षात आल्याचे सांगितले आहे. दरम्यान भाजपला प्रादेशिक पक्ष आणि मित्र पक्षाला संपवण्यात अधिक रुची असल्याची टीका ठाकरे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वेळीच निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी नितीशकुमारांचे अभिनंदन केले. महापालिका निवडणुकांच्या अनुशंगाने उद्धव ठाकरेंनी यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
ज्यांनी शिवसेनेबाबत गद्दारी ते निवडुण येऊ शकत नाहीत –
शिवसेनेतून ज्या आमदार-खासदरांनी बंडाची भूमिका घेतली त्यांच्यावर पक्षप्रमुखांनी उघडपणे बोलले आहेत. ज्यांनी शिवसेनेबाबत गद्दारी आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना जनता स्विकारणार नाही. ज्यांनी शिवसेनेसोबत अशा प्रकारचे कृत्य केले त्यांचे राजकीय भवितव्य काय हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार हे निवडुण येऊ शकत नाहीत. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष न देता शिवसेना पक्ष संघटन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या संदस्य नोंदणीला प्राधान्य देण्याचे आवाहन ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना केले आहे.
आपली लढत भाजपशी –
मागच्या निवडणूकीत मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपा हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हाही शिवसेना जिंकली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्येही असेच चित्र राहिल. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संपर्क, लोकांचे प्रश्न आणि संघटन यावर भर द्या असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. एवढेच नाहीतर त्यांनी शिंदे गटाला महत्व न देता आपली लढत ही भाजपाशीच असल्याचे सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार काहींसाठी गोड तर काहींना कडवट –
मंत्रिमंडळ विस्तारावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. या विस्तावरुन नाराजीचा तर सूर आहेच पण ज्यांना याबाबत आत्मविश्वास होता त्यांना देखील माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे हा विस्तार काहींसाठी गोड तर काहींना मात्र, कडवट असल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष आ. बच्चू कडू यांच्यावर टीका केली.