शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात बंडखोरी केली. यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आमदारांनी पाठिंबा दिला. भाजप आणि शिंदे गटाच्या गोटातून या वेळेतील अनेक गोष्टी समोर आल्यानंतर शिवसेनेच्या गोटातील काही गोष्टी समोर येत आहेत. सत्तासंघर्षात पक्ष वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशी चर्चा सुरु आहे. शिंदेंना सोडा आम्ही शिवसेना – भाजप युतीसाठी तयार आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याची जोरादर चर्चा सुरु आहे. दरम्यान हे वृत्त शिवसेनेकडून फेटाळण्यात आले असून या केवळ अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन सत्तासंघर्षात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत शिंदेंना सोडण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितले अशी चर्चा आहे. यावर आता शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मंत्री आणि फडणवीसांच्या जवळचे माणल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क केला असल्याचे सांगितले जात आहे.
त्या बातम्या खोट्या – शिवसेना
शिवसेना आणि सरकार वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच एकनाथ शिदेंना सोडण्याच्या बातम्या खोट्या आहेत. या बातम्या केवळ भूलथापा आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच या भूलथापांमधून गैरसमज करुन घेऊ नये असे शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन
विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे निष्ठावान नेते आणि माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासोबत एकूण १५ ते २० आमदार होते. एका आमदाराला त्यांनी पुन्हा सोडले परंतु यानंतर त्यांच्या गटाची संख्या वाढू लागली. वाढती संख्या पाहून पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांची बारगेनिंग पावर का वाढवताय ? थेट आमच्याशी बोला. आपण भाजप- शिवसेना युती करु असे उद्धव ठाकरें फडणवीस यांना म्हणाले. यावर फडणवीसांनी आम्ही शिंदेंना शब्द दिला असून त्यांच्या विश्वासाला फसवू शकत नाही. तुम्ही केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क करा असे सांगितले. यानंतर ठाकरेंनी अमित शाह यांना फोन केला मात्र अमित शाह यांनी फोन घेतला नाही. पंतप्रधान मोदींशी संपर्क साधला असता ते बाहेर दौऱ्यावर होते. त्यांनी अमित शाह यांच्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला होता अशी चर्चा होती. या चर्चांचे शिवसेनेकडून खंडण करण्यात आले आहे.
हेही वाचा : उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांना उमेदवारी