केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. ज्यावरून ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे. निवडणूक आयोगही एक संस्था होती ती आता वेठबिगार झाली आहे. अर्ज केल्यानंतर कोणीतरी तक्रार केली ती तक्रार खोटी की खरी याची छाननी नाही. आम्ही उत्तर दिले त्यांची छाननी नाही. चार तासांत निर्णय देऊन टाकला. कोणाच्या आदेशावर वागत आहे? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. अरविंद सावंत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी अरविंद सावंत म्हणाले की, निवडणुक आयोग ही संस्था वेठबिगार झाली आहे. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे देश हुकुमशाहीकडे जात आहे. कसली छाननी न करता घेतलेला निर्णय हा देशाच्या संविधानावर छाव घालणारा निर्णय आहे. त्यामुळे देशातील चारही स्तंभ स्वायत्त आहेत असं वाटत नाही. त्यासंदर्भात हा धक्कादायक निर्णय आहे. कोणीही आकडा सांगेल.. जो घरदार सोडून गेला तो यावर क्लेम करतो. तो एक शब्द बोलला आहे, महाशक्ती आहे आमच्या मागे… देशाचे गृहमंत्री म्हणतात शिंदे गटचं खरी शिवसेना, कोर्टाच्या अगोदर हे सांगतात. सातत्याने अशाप्रकारची वक्तव्य करतात. त्यांच्या गटातील एक माणूस सांगतात पाच वर्ष निर्णय लागणार नाही कशाचं घोतक आहे हे. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या पाठीत सुरा खुपसणारे हे वक्तव्य आहे. न्यायसंस्थेवर संशय येईल असं वक्तव्य आहे. यात निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर यावर शिक्कामोर्तब झाला आहे.