घरमहाराष्ट्रमविआ सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर, उद्धव ठाकरेंनी गमावले नियंत्रण, आता पुढे काय?

मविआ सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर, उद्धव ठाकरेंनी गमावले नियंत्रण, आता पुढे काय?

Subscribe

31 ऑक्टोबर 2019 ला एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली असून, ते अद्यापही विधिमंडळ पक्षनेते आहेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे

मुंबईः Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे आता महाविकास आघाडी सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत. शिंदेंच्या गोटात अजूनही एक एक आमदार जात असून, उद्धव ठाकरेंच्या हातातून नियंत्रण सुटताना दिसत आहे. दरम्यान, 37 बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून स्वीकारले आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. स्वत:ला विधिमंडळ पक्षनेते म्हणवून घेत एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल आणि उपसभापतींना पत्र लिहिल्यानंतर राज्यात राजकीय सट्टाबाजार चांगलाच तापला आहे. शिंदे यांनी हे पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल, उपसभापती आणि विधानसभा सचिवांना लिहिले आहे.

राज्यपाल आणि उपसभापतींना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्या आहेत. 31 ऑक्टोबर 2019 ला एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली असून, ते अद्यापही विधिमंडळ पक्षनेते आहेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सुनील प्रभू यांच्या जागी शिंदे गटाने एकमताने भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे आरपारच्या मूडमध्ये!

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपसभापतींना पत्र लिहून आणि भरत गोगावले यांची मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती करून एकनाथ शिंदे यांनी आता आपण लढण्याच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांकडे भरत गोगावले यांनी आपल्याला 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ जारी करून उद्धव ठाकरेंना आणखी एक नवं आव्हान दिलं आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांशी बोलताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंविरोधात उठलेल्या आवाजाला ऐतिहासिक म्हणत आहेत.

एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढली

आपल्या मागे एक महासत्ता उभी आहे, ती राष्ट्रीय शक्ती आपल्याला गरज पडेल तेव्हा साथ देईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. दरम्यान, समर्थक आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. रात्री उशिरा आणखी दोन अपक्ष आमदार गीता जैन आणि किशोर जोरगेवार हे रेडिशन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 46 आमदार गुवाहाटीला पोहोचले असून, 46 समर्थकांपैकी 37 शिवसेनेचे तर 9 अपक्ष आमदार आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणालेत की, ‘पक्ष महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार आहे. जर तुम्ही शिवसैनिक असाल, तुम्ही शिवसेना सोडत नाही आणि तुमचा मुद्दा सरकारबाबत आहे, असे म्हणत असाल, तर शिवसेना सरकार आणि महाआघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. पण आधी इथे या आणि हिंमत दाखवा आणि उद्धव ठाकरेंसमोर तुमच्या मागण्या मांडा. त्यावर निश्चित विचार केला जाईल, असा दावा त्यांनी केला.

पक्षांतरविरोधी कायद्यात शिंदे गट टिकेल का?

महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे एकूण 55 आमदार आहेत. पक्षांतरविरोधी कायद्यातून बाहेर पडण्यासाठी शिंदे गटाला दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. दाव्यानुसार शिवसेनेचे 37 आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. ज्यामुळे शिवसेना कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, हे राजकीय वादळ थांबताना दिसत नाही. उद्धव ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.


हेही वाचाः शरद पवारांच्या एन्ट्रीने फडणवीसांचा सत्ता स्थापनेचा खेळ लांबला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -