२०१४ साली केलेले जुमले माफ केले. पण देवांच्या नावावर जुमले केलात तर माफ करणार नाही अशा शब्दात राम मंदिरावरून भाजपला उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.
जागा वाटप गेलं खड्ड्यात. मला शेतकऱ्याच्या प्रश्नाचं पडलं आहे. राम मंदिर केव्हा बांधणार केव्हा ते सांगा. शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार ते सांगा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला केला आहे. निवडणुकीवर नंतर बोलू पण सर्व प्रश्न केव्हा सोडवणार ते सांगा? असा सवाल देखील उद्धव यांनी केला.
लोकांच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टिका केली.
३० वर्षापासून राम मंदिराचा मुद्दा प्रलंबित आहे. ३० वर्षापूर्वी मस्जिद पाडली. सोहराबुद्दीन केस सोडवून घेतलात. मग मस्जिद पाडणाऱ्यांवरच्या केसबाबत काय? असा सवाल विचारत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शहा यांना लक्ष्य केलं.
शिवसेना – भाजप युतीबद्दल मी आता काहीच बोलणार नाही. जो निर्णय घ्यायचा तो जनता घेईल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना – भाजप युतीबद्दल आत्ताच काहीही बोलणं टाळलं आहे. दरम्यान राम मंदिराबद्दल नितीश कुमार यांचं मत काय? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांना केला.
राफेल करारामध्ये घोटाळा, शेतकरी कर्जमाफीमध्ये घोटाळा मग हे सरकार कुणाचं? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. जर, राफेल विमान बांधणीमध्ये अंबानींच्या कंपनीला कंत्राट देता. मग आमच्या बचत गटांना गोळ्या तयार करण्याचं कंत्राट देणार का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला करत राफेल विमान खरेदीवरून सरकारला ल्क्ष्य केलं.
राफेल विमान खरेदीच्या मुद्यावरून देखीव उद्धव ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला. तुम्ही राफेल विमान खरेदी करा. मग सैन्याच्या पगार वाढीचा प्रस्ताव का फेटाळला? असा सवाल देखील यावेळी उद्धव यांनी सरकारला केला.
दुष्काळाचा हवाला देत उद्धव ठाकरे यांनी ‘पहारेकरी देखील चोरी करतात’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना हाणला. बीडमध्ये एका शेतकऱ्यानं कडुलिंबाला किड लागल्याचं दाखवलं. त्याचा हवाला देत उद्धव यांनी हा टोला लगावला आहे. दरम्यान, मी जे बोलतो ते करतो. सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
झोपलेल्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी मी अयोध्या दौरा केला असं म्हणत राम मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या भाजपला लक्ष्य केलं. झोपलेल्या कुंभकर्णा जागा हो नाहीतर हिंदु तुम्हाला तुमची जागा दाखवेल असं देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा हवाला देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. तेलंगणा आणि छत्तीसगडमधील जनतेनं भाजपला जागा दाखवून दिली अशा शब्दात उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधला.
पंढरपूर दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी धनगर आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन धनगर समाजाला दिलं. मराठा आरक्षणासाठी ज्याप्रमाणे शिवसेनेनं लढा दिला, त्याप्रमाणे शिवसेना धनगर समासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी शिवसेना लढा देईल असं उद्धव यांनी म्हटलं. पंढरपूरमधील जाहीर सभेदरम्यान उद्धव यांनी धनगर समजाला आरक्षणासाठी आश्वासन दिलं.