राज्यातील ज्या भागात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. अशा भागात शाळा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सचा विचार आहे. मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत शाळा सुरु करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. शाळा सुरु करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांचे ५ सप्टेंबरपर्यंत डबल लसीकरणाबाबत स्पेशल ड्राइव्ह घेण्यात येणार आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेचे पालन करुन राज्यात सणासुदीच्या काळात कोरोना निर्बंध कडक करण्यात येतील मात्र राज्यातील जनतेने कोरोना परिस्थितीचे भान ठेवलं पाहिजे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री लवकर राज्यातील कमी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या ठिकाणी शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतील असे म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स शाळा सुरु करण्याच्या विचारात आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील. राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात कधी निर्णय होईल याची कल्पना नाही. शिक्षकांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी ५ सप्टेंबरला शिक्षकांसाठी डबल लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. शाळा सुरु करण्यापुर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पुर्ण करुन घेण आवश्यक असल्यामुळे राज्य सरकार उपाययोजना करत आहे.
काळजी घेणं गरजेचे – राजेश टोपे
राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. मात्र सणांच्या दिवसात नागरिकांनी काळजी घेणं गरजेचे आहे. केरळमध्ये सणांदरम्यान गर्दी झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केरळमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी गणेशोत्सव, नवरात्र या सणांमध्ये काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकारने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : भ्रष्टाचाराच्या पुराव्यानुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; क्लिनचिटवर CBI चं स्पष्टीकरण