राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकारण आता चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष पुढील निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. ही बैठक वर्षा या शासकीय निवासस्थानी आज संध्याकाळी चार वाजता होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बैठकीचा मुद्दा काय?
उद्धव ठाकरे यांनी कोकणातील आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील आढावा घेण्यात येणार आहे. आगामी काळात निवडणुकांतील मोर्चेबांधणी, पक्षाचा तळागाळात विस्तार आणि विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
उद्धव ठाकरे गेल्या वर्षभरापासून उपचार घेत असल्यामुळे ते कोणाच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे शिवसेनेतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची दैखील ते बैठका घेऊ शकले नव्हते. परंतु आता मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारल्यामुळे त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे. ते कोकणातील आमदारांच्या बैठका घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे अंतर्गत राजकारण आणि कामात अडथळा निर्माण करणं किंवा पक्ष वाढीसाठी येणाऱ्या अडचणी, या सर्व विषयांवर आमदार काँग्रेसविरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार हे पाहणं मह्त्त्वाचं ठरणार आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे येत्या १० जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासंबंधीत माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांनी दिली आहे. या दौऱ्यानिमित्त शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : संजय राऊतांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्यावेत, किरीट सोमय्यांची आक्रमक भूमिका