शिवसेनेत पडलेली फूट ही बंडखोरांनी नव्हे तर भाजपने पाडली असून भाजपच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केला. माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी भाजपला नाव न घेता दिला.
उत्तर भारतीय महासंघाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याची भावना व्यक्त केली.
त्यावेळी बोलताना, ठाकरे संकटाला घाबरत नाहीत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करु, पुन्हा पक्ष नव्याने उभा करु, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.
उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत भाजप आणि शिंदे गटाचा समाचार घेतला.ते म्हणाले, भाजप दोन कोंबड्यामध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱ्याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. पण आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे. संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हे ही दिवस जातील, तोपर्यंत मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, सध्या शिवसेनेचा कठीण काळ सुरु आहे. भगव्याचे निष्ठावंत शिलेदार एक एक करुन तुमची साथ सोडत आहेत. पण या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे आम्ही पदाधिकारी तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.