घरमहाराष्ट्रमुंबई पोलिसांचा ‘उमंग’ कार्यक्रम रद्द

मुंबई पोलिसांचा ‘उमंग’ कार्यक्रम रद्द

Subscribe

पांडे यांनी कोरोनाचे कारण देत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून हा निर्णय जाहीर केला असला तरी सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे हा कार्यक्रम रद्द केल्याचे पोलीस खात्यामध्ये बोलले जात आहे.

मुंबई पोलिसांच्या कल्याण निधीसाठी दरवर्षी ‘उमंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी बीकेसी ग्राऊंडवर २६ जून रोजी होणारा हा कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला आहे. पांडे यांनी कोरोनाचे कारण देत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून हा निर्णय जाहीर केला असला तरी सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे हा कार्यक्रम रद्द केल्याचे पोलीस खात्यामध्ये बोलले जात आहे. (Umang program of Mumbai police has been cancelled)

दरवर्षी होणार्‍या ‘उमंग’ कार्यक्रमामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकारांपासून अनेक नामवंत व्यक्ती, पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंब सहभागी होतात. या कार्यक्रमाला विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी पोलीस व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरण्यात येतो. यंदाही एका खासगी कंपनीने या कार्यक्रमाला सुमारे पाच कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले होते, मात्र पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कोरोनाचे कारण देत हा कार्यक्रम रद्द केल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले. कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पोलिसांच्या कल्याण निधीसाठी दरवर्षी घेण्यात येणारा ‘उमंग’ हा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. यामध्ये सहभागी होणार्‍या सर्व कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे धन्यवाद, अशी फेसबुक पोस्ट करीत पांडे यांनी २६ जूनला होणार उमंग कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

कोरोनाचे कारण देत हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरी यामागे सध्या राज्यात असलेली राजकीय अस्थिरता कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलीस आयुक्तांकडून जोरदार कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे राज्यातील बदलते राजकीय समीकरण पाहता त्यांनी हा निर्णय दबावाखाली घेतला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पांडे यांचा निर्णय योग्य असल्याचे पोलीस खात्यातील काही अधिकार्‍यांकडून म्हटले जात आहे, तर काही अधिकार्‍यांनी हा कार्यक्रम व्हावा यासाठी अद्यापही प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे सतर्कतेचे आदेश
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये त्यांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पोलीस आयुक्तांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -