राज्याच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय उलथा-पालथ होत आहे. राज्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करून सरकार स्थानप केले. त्यानंतर आता मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे अनेक नेतेमंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. त्यामुळे येत्या काळात मनसे-भाजपा युती होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र असे असले तरी आता याच युतीच्या चर्चेवर केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. (Union minister and RPI chief ramdas athawale talk on mns bjp alliance)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास आठवले यांनी भाष्य केले. त्यावेळी ते म्हणाले की, “माझ्या मते मनसेची काही आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आपल्यासह आलाय. मागील वेळी शिवसेना आणि आम्ही स्वतंत्र लढलो होतो. भाजप आणि आरपीआय एकत्र आणि शिवसेना वेगळी लढली होती. तरी देखील भाजपा आणि आरपीआयने जवळपास 82 जागा निवडून आणल्या होत्या”, असे रामदास आठवले यांनी म्हटले.
“राज ठाकरे यांना बरोबर घेतले तर उत्तर भारतीयांची, दक्षिण भारतीय लोकांची मते आपल्याला मिळणार नाही. मनसेशी युती केली तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपाला त्यांना बरोबर घेणे परवडणार नाही. त्यांना आपल्या बरोबर आणून फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे”, असे आठवले यांनी म्हटले.
याशिवाय, “एकनाथ शिंदेंची शिवसेना आमच्या बरोबर असल्याने, आम्हाला मुंबई महापालिका निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतापेक्षाही अधिक जागा आम्हाला मिळतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. राज ठाकरे हे राज्यातील सक्रीय नेते आहेत, ते चांगलं भाषण करतात. त्यांच्या सभादेखील मोठ्या होतात, पण त्यांना मतं मिळत नाहीत. अशाप्रकारची परिस्थिती आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यावं या मताचा मी अजिबात नाही. राज ठाकरेंची अजिबात आवश्यकता नाही”, असेही आठवले यांनी म्हटले.
हेही वाचा – प्रवाशांना बाप्पा पावला; रविवारी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नाही