धुळे-सोलापूर महामार्गाचे विस्तारीकरण झालं आहे. मात्र, शहरातून जाणाऱ्या १२ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचा प्रश्न उभा राहिला. दरम्यान, हा प्रश्न आता निकाली लागला आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी साधलेली संधी. बुधवारी दिल्लीत शरद पवार आणि नितीन गडकरी योगायोगाने एकत्र आले होते. त्याचवेळी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गडकरींकडे रस्त्याचा प्रश्न मांडला आणि हा प्रश्न मार्गी लागला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग याआधी शहरातून जात होता. मात्र, काही वर्षांपूर्वीच या रस्त्याचे विस्तारीकरण झालं आहे. त्यामुळे महामार्ग बीड बायपासद्वारे शहरापासून गेला. परिणामी कोल्हारवाडी बायपास ते बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना रोड मार्गे जिरेवाडी बायपास या १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे विस्तारीकरण, मजबुतीकरण, ड्रेनेज असा प्रश्न निर्माण झाला. या कामांना मंजूरी मिळावी यासाठी संदीप क्षीरसागर पाठपुरावा करत होते.
यासाठी त्यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून यापूर्वीही नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. मात्र, या नूतनीकरणाच्या कामात काही तांत्रिक अडचणी असल्याने कामाला प्रशासकीय मान्यता मिळत नव्हती. दरम्यान, बुधवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील दिल्लीत असताना संदीप क्षीरसागर हा मुद्दा घेऊन पोहोचले. त्यानंतर पवारांच्या परवानगीने संदीप क्षीरसागर यांनी गडकरींकडे हा मुद्दा उपस्थित करून प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी या कतामांना ग्रीन सिग्नल देत मंजूरी दिली आहे.