देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कोरोनाने सगळेच जण हैराण झाले असताना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यातील आऱोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला असून रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र भासतोय. अशापरिस्थितीत रेमडेसिवीर या इंजेक्शनचा साठा केला जातोय किंवा काळाबजार होत असल्याचेही सांगितले जात आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांपैकी एक असणाऱ्या नागपुरात देखील कोरोनाचा फैलाव सुरू असून तिथली परिस्थिती गंभीर झाली आहे. नागपुरात देखील रेमडेसिवीर या इंजेक्शनचा साठा संपल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणामध्ये आवर्जून लक्ष घातले आहे.
दरम्यान, शनिवारी गडकरींनी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला आणि १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पुन्हा उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती केली. यानंतर शनिवारी त्वरीत त्यांना ५ हजार इंजेक्शन सन फार्माकडून दिले गेले, तर उर्वरित ५ हजार इंजेक्शन्स येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर त्याचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनसह औषधांचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे शनिवारी नितीन गडकरी यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होण्यासाठी वेगाने पाऊलं उचलली आणि थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीसुद्धा सन फार्माच्या मालकाकडे त्यांनी केली.
यासह राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील शनिवारी रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता आणि त्याचा पुरवठा अपुरा असल्याचे सांगितले. तर रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोठा आरोप केला आहे. गुजरातच्या भाजप कार्यालयामध्ये रेमडेसिवीरचा मोठा साठा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.