सोलापूर : राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे हवामान खात्याकडून देण्यात आलेला अंदाज अचूक ठरला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील काही भागांत आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. तर पुढील काही तासांमध्ये भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. (Unseasonal rains in West Maharashtra)
हेही वाचा – आमची खिचडी तर तुमचा आनंदाचा शिधा; ठाकरे गटाने मांडला हिशेब
परंतु महत्त्वाची बाब म्हणजे हा पाऊस अवकाळी असला तरी, या पावसामुळे ज्वारीसह रब्बी हंगामातील सर्व पीकांना लाभ होणार आहे. तर, द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी मात्र काहीसा नुकसानकारक ठरणारा असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोलापूरात आज झालेल्या पावसाची नोंद 28 मि.मी. इतकी करण्यात आली आहे.मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळी उजाडेपर्यंत कमी-अधिक स्वरूपात सुरूच होता. काही भागात वीजेच्या कडकडासह पाऊस झाला तर काही भागात मध्यम व हलक्या स्वरुपात पाऊस झाला आहे. दक्षिण, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढासह अन्य तालुक्यातही हा पाऊस झाला आहे. त्यामुळे या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रब्बी पीकांसाठी मात्र पोषक हवामान तयार झाले आहे.
आज (ता. 08 नोव्हेंबर) सकाळपासूनच राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान पाहायला मिळाले. येत्या काही दिवसात अशा स्वरुपाचा आणखी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाअभावी रब्बी पेरण्या पूर्ण क्षेत्रावर झाल्या नाहीत. ज्यांनी पेरणी केली त्यांची उगवणही पूर्णता झाली नाही अशी स्थिती आहे. आणखी एखादा मोठा पाऊस झाला तर उशीरानेही रब्बीच्या पेरण्या होतील अशी शक्यता आहे. तसेच खरीपाच्या तूर पिकासाठीही हा लाभदायक ठरू शकतो. द्राक्ष छाटणी केलेल्या बागांना सध्या फुलोरा आला आहे. त्यामुळे पावसाच्या तडाख्याने त्याची गळती होवू शकते, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकणातही पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. रायगड जिल्ह्यातील आणि कोकणात सकाळपासूनत रिमझिम पाऊस सुरू आहे. तर, कोल्हापूरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यात दमदार पाऊस झाला. आदमापूर परिसरात सुद्धा जोरदार पाऊस झाला अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. तर मळणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. कोल्हापूरमध्ये मागील दोन दिवस ढगाळ वातावरण होते. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात पाऊस झाला.