घरताज्या घडामोडीराज्यभरात ‘वात्सल्य’ उपक्रम राबवणार; यशोमती ठाकूर यांची माहिती

राज्यभरात ‘वात्सल्य’ उपक्रम राबवणार; यशोमती ठाकूर यांची माहिती

Subscribe

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘वात्सल्य’ हा अभिनव उपक्रम सुरू असून निराधार मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी हा उपक्रम पुढील काळात राज्यभरात राबवण्याचा मानस असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी सांगितले. कोरोनामुळे महाराष्ट्रात विधवा झालेल्या महिलांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा आणि उपाययोजना याबाबत ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कोरोनासंसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे जसे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच विधवा झालेल्या महिलांच्या समस्याही समोर आल्या आहेत. या महिलांना कुटुंबातून तसेच वारसा हक्कातून बेदखल करण्याच्या घटना समोर येत आहेत. या महिलांना संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य योजनांचा लाभ मिळेल यादृष्टीने अनाथ बालकांसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘वात्सल्य’ उपक्रमामध्ये समावेश करण्यात येईल. या निराधार महिलांसाठी रोजगार निर्मिती तसेच त्यांचे दैनंदिन बाबींसाठी लागणारी मदत देण्याच्या दृष्टीकोनातून नक्कीच काम केले जाईल, असे अॅड. ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून महिला आणि बालकांच्या योजना राबवण्यासाठी अपेक्षित मदत मिळणे गरजेचे आहे. तरीही जास्तीत जास्त मदत करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचे सर्वेक्षण आदी कामाचाही समावेश करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

या बैठकीला महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इद्झेस कुंदन, सहसचिव शरद अहिरे, आयुक्त राहुल मोरे, उपायुक्त दिलीप हिवराळे, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्यासह महिलांसाठी काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दीडशे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -