मोबाईल सेवा पुरवणार्या वोडाफोन आणि आयडीया या कंपनीच्या देशभरातल्या ग्राहकांना आज दिवसभर सेवा विस्कळीत झाल्यानं प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नाशिकसह मालेगाव, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, चेन्नई, दिल्ली, लखनौ अशा विविध शहरांत आज दुपारी साडेबारा वाजेपासून व्ही-आय कंपनीच्या ग्राहकांची सेवा बाधित झाली होती.
काही शहरांमध्ये इंटरनेट आणि फोन कॉल्स दोन्हीही बंद होते, तर काही ठिकाणी केवळ इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी भागीदार असलेल्या अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्या बाहेर पडण्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. त्यातच आज अचानक सेवा कोलमडल्यानं ग्राहकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. कंपनीचे भारतात २७ कोटी ग्राहक असून, या सर्वांनाच आज कमी अधिक प्रमाणात फटका बसला. सोशल मीडियावरुन ग्राहकांनी कंपनीवर प्रचंड रोष व्यक्त केला.