छत्रपती संभाजीनगर : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी आवाज उठला आहे. त्याच धस, क्षीरसागर, सोळंके आणि जरांगे-पाटील यांच्या जवळील कार्यकर्त्यांनी किंवा व्यक्तींनी दुसऱ्यांना मारहाण केल्याचे सांगत व्हिडिओ समोर येत आहेत. पण, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील लक्ष हटवण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ समोर आणले जात आहे, असा आरोप मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, “राजकीय लोक जर एखाद्या प्रश्नामध्ये घुसले तर सामजिक प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सारख्या माणासांना अडचणी निर्माण होतात. हे लोकं मॅटर दाबण्यासाठी आतून ही व्हिडिओ बाहेर काढण्याची शाळा खेळू शकतात. मी तुझा व्हिडिओ दाखवतो, तू माझा व्हिडिओ दाखव, आता हे सुरू झाले आहे. थोड्या दिवसांत अनेकांचे व्हिडिओ समोर आणले जातील. कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जात आहे.”
फडणवीस आरक्षण देणार असल्याने आम्ही शांत
“महायुतीची सत्ता येऊन चार आणि तर मी उपोषण सोडून एक महिना उलटून गेला आहे. आता ते काय करतो हे आम्ही बघत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याने आम्ही शांत आहोत. तुम्ही असे समजायचे नाही मग की आम्ही शांत आहोत म्हणजे तुम्ही आमची फसवणूक करणार तर आम्ही तुम्हाला वठणीवर आणू,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.
सरकारने गोड बोलून जनतेची मान कापली
“सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांनाही काही दिले नाही. कर्जमाफी नाही किंवा कर्जमुक्तीही नाही. त्यांनी गोरगरिबांच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी काढला नाही. म्हणजे सरकारने केवळ गोड बोलून जनतेची मान कापली. त्यामुळे इथून पुढे कमी सांगायचे, कमी बोलायचे व अचानक आंदोलन करायचे या भूमिकेशिवाय सरकार आता ठिकाण्यावर येणार नाही. सरकारकडे जसा कावा आहे, तसा गरिबांकडेही आहे,” असे जरांगे-पाटील यांनी म्हटले.