राज्यात आज विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडतेय. या निवडणुकीत विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यसभेत पराभवाचा सामान करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला पुन्हा पराभूत करण्यासाठी फडणवीस कोणती चाल खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. आत्तापर्यंत 275 आमदारांनी विधान परिषदेसाठी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मविआचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे निकाल महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनेच लागेल, आमचा कोटा ठरवून आम्ही समीकरण योग्य जुळवलं आहे. मतांच्या समीकरणाचा फायदा महाविकास आघाडी सरकारच्या सहाव्या उमेदवाराला होणार आहे. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस आमदारांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर नाना पटोले विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते. यावेळी नाना पटोलेंनी विरोधकांवर देखील टोला हाणला आहे.
नाना पटोले म्हणाले की, फोडाफोडीचं राजकारण यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. काँग्रेसच्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. संख्याबळाच्या आधारे निकाल महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचे दिसून आले, भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. तरी महाविकास आघाडी सरकारने देखील आपले समीकरण योग्य जुळवलं आहे. असंही नाना पटोले म्हणाले आहेत.