मुंबईत होणाऱ्या ‘मराठी तितुका मेळवा’ संमेलनाचे राज्य सरकारने आम्हाला निमंत्रण न दिल्याचे सांगत आमदार आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री व शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विश्व मराठी संमेलनाची जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये दिली आहे, सामनातही छापून येईल. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना वेगळ्या निमंत्रणाची गरज काय”, असे प्रत्युत्तर केसरकर यांनी म्हटले. (vishwa marathi sammelan 2023 aaditya thackeray deepak kesarkar saamana)
“विश्व मराठी संमेलनाची जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये दिली आहे, सामनातही छापून येईल. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना वेगळ्या निमंत्रणाची गरज काय आहे. मी वैयक्तिकरित्या कोणालाही जाऊन निमंत्रण दिलेले नाही. अन्यथा मी एकाला निमंत्रण दिले आणि दुसऱ्याला नाही, असा वाद निर्माण होऊ शकतो. केवळ प्रोटोकॉलनुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती यांना अधिकृतरित्या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. सरकारी कार्यक्रमांना सर्व आमदार आणि खासदारांनाही बोलवावे लागते. त्यामुळे आदित्य ठाकरे हेदेखील आमच्या अतिथींच्या यादीत आहेत”, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंची टीका
“मला अद्याप या संमेलनाचे अधिकृत निमंत्रण आलेले नाही. मला काय कोणालाच या संमेलनाचे निमंत्रण आलेले नाही. हे सरकार महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवणारे सरकार आहे. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवायच्या”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
- मुंबईतील वरळी येथे विश्व मराठी संमेलन २०२३ पार पडणार आहे.
- ४ ते ६ जानेवारी या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन होईल.
जगभरात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनाचे बुधवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र या उद्धाटनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंच्या गाडीचा परळीत भीषण अपघात, सुदैवाने मुंडे बचावले