मुंबई – मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ७.२१ टक्के पाणीपट्टी वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. जूनपासून पाणीपट्टी पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.
महापालिकेने २०१२ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार किमान ८ टक्के पाणीपट्टी वाढवता येते. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टीत वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता लॉकडाऊन निर्बंध हटले आहेत. रोजगार सुरळीत झाला आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढीला आता परवानगी मिळाली आहे.
हेही वाचा – बेस्टने वीज अनामत रक्कम वसुलीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन; काँग्रेसचा इशारा
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पालिकेकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. पाणीपट्टीत वाढ झाल्याने पालिकेला दरवर्षी ९१.४६ कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.
मुंबई पालिकेकडून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवले जाते. त्यासाठी आस्थापना खर्च, धरण व इतर देखभाल खर्च, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, विद्युत खर्च पालिकेकडून केला जातो. या सर्व खर्चाचा विचार करून पाणीपट्टीत वाढ केली जाते. आस्थापना खर्च ५१८ वरून ५७७ रुपये झाला आहे. तर, प्रशासकीय खर्च १२५ रुपयांवरून घटून ८५ रुपये झाला आहे. विद्युत खर्चातही एक रुपयाने वाढ होऊन २२१ वरून २२२ रुपये झाला आहे.
सरकारी तलावांतूनही पाणीपुरवठा केला जातो. त्याचा खर्च ८७ रुपयांवर १०१ रुपये झाला आहे. इतर प्रचालन आणि परीरक्षण खर्च ८१ वरून १२०.४८ रुपये झाला आहे.
हेही वाचा – हॉटेल मुंबईतलं अन् शेफ हाँगकाँगचा, पगार ऐकून गडकरी झाले अचंबित
कोणाला किती दरवाढ?
- झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे- ४.७६ पैसे
- झोपडपट्ट्यांतील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती- ५.२८ पैसे
- व्यावसायिक ग्राहकांसाठी- ४७.७५ पैसे
- बिगर व्यावसायिक संस्था – २५.४६ पैसे
- उद्योगधंदे, कारखाने – ६३.६५ पैसे
- रेसकोर्स, तीन व त्याहून अधिक तारांकित हॉटेल -९५.४९ पैसे
- बाटलीबंद पाणी कंपन्या – १३२.६४ पैसे