मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज, रविवारी जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. तसेच, ते येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमास राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट संतप्त झाला आहे. राजशिष्टाचार आम्हाला शिकवायची गरज नाही, असे ठाकरे गटाने शिंदे फडणवीस सरकारला सुनावले आहे.
भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र आणि जळगाव जिल्हा जहागिरी नाहीत. महानगरपालिका ही राज्यघटनेनुसार स्वायत्त संस्था असून ती नागरिकांच्या विकासासाठी निर्णय घेण्यास सक्षम आहेत.जळगाव मनपा तर्फे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या… pic.twitter.com/dxLY44l9i2
— Ambadas Danve (@iambadasdanve) September 10, 2023
जळगाव महापालिकेमध्ये सत्तेवर ठाकरे गट असून भाजपा आणि शिंदे गट विरोधक आहेत. महापालिकेतर्फे पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तर महापालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, रविवारी जळगावच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण करण्याचे ठऱले. तथापि, दोन्ही पुतळ्याचे अनावरण शासकीय शिष्टाचारानुसार व्हावे, अशी मागणी शिंदे गटाच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच जिल्ह्यातील तिन्ही मंत्री यांची तारीख व वेळ घेऊन त्यानुसार या हा सोहळा आयोजित करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार आयुक्तांनी शासनाला पत्र पाठविल्यावर शासनाने आजच्या कार्यक्रमाला स्थगिती दिली.
हेही वाचा – ठाकरेंच्या जळगाव दौऱ्याआधी महाराष्ट्र शासनाचं महापालिका आयुक्तांना पत्र; संजय राऊत म्हणतात…
यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. भाजपाची महाराष्ट्र आणि जळगाव जिल्हा जहागिरी नाहीत. महानगरपालिका ही राज्यघटनेनुसार स्वायत्त संस्था असून ती नागरिकांच्या विकासासाठी निर्णय घेण्यास सक्षम आहेत. जळगाव मनपातर्फे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे, त्यामुळे या पुतळ्यांचे अनावरण करणे हा महानगरपालिकेचा अधिकार आहे. यांच्या बांधकामात भाजपाचे कणभर सुद्धा योगदान नसताना राज्य सरकार या पुतळ्यांचे अनावरण करेल असा आग्रह धरणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखी स्थिती आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
हेही वाचा – भारतातील पहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला; उद्या होणार प्रकल्पाचा शुभारंभ
भाजपाच्या बापाचे राज्य नाही. महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे, अनावरण कोणाच्या हस्ते करायचे, ते ठाकरे गटाचा महापौर ठरवेल. आम्हाला राजशिष्टाचार आम्हाला शिकवायची गरज नाही, असेही त्यांनी सुनावले.