बंडखोर शिंदे गाटतील आमदारांची आज दुपारी बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढल्याबाबतचे पत्र राज्यपालांना द्यायचे की नाही जर द्यायचे झाले तर ते कधी या मद्यावर चर्चा होणार आहे. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी याबाबत माहिती दिली.
आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो आहोत –
आम्ही पूर्ण तयारीनिशी येथे आलो आहोत. 11 जुलैपर्यंत येथे राहावे लागले तरी चालेल, आम्ही तयार आहोत. ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. नियमांनुसार जी प्रक्रिया होणे गरजेचे आहे, ती केली जात आहे. आम्ही काळजीपूर्वक पाऊल उचलत आहोत, कारण छोटीसी तरी चूक झाली तर काहीही फायदा होणार नाही. आजच्या बैठकीत राज्यपालांना पाठिंबा काढल्याबाबत पत्र द्यायचे की नाही आणि जर द्यायचे असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. आमच्या गटातून कोणीही बंडखोरी करणार नाही. उद्धव ठाकरे गटाला जे करायचे ते त्यांनी करावे, आम्ही या लढाईसाठी पूर्णत: तयार आहोत, असे भरत गोगावले म्हणाले.
सुप्रीम कोर्टात 38 आमदारांनी पाठिंबा काढल्याचा दावा –
सुप्रीम कोर्टात काल (27 जून) झालेल्या सुनावणीआधीच मोठी बातमी समोर आली होती. बंडखोर 38 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे. बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा उपाध्यक्षांनी सुरु केलेली अपात्रतेची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. महाविकास आघाडीचा 38 आमदारांनी पाठिंबा काढला आहे. त्यामुळे सरकारने बहुमत गमावले आहे. त्यानंतरही विधानसभा उपाध्यक्ष कार्यालयाचा दुरुपयोग राज्य सरकारने सुरु केल्याचे बंडखोर आमदारांनी याचिकेत म्हटले आहे.