मुंबई : मला वर्षभरापासून चेकमेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आम्ही राजकारणातील बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांचा रोख नक्की कोणावर होता, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, याबाबत विचारणा करत आम्ही आपल्या बाजून उभे राहू, असा शब्द राज्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
मला राजकारणातून चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राजकारण सरळ मार्गाने करायचं असतं उंटाची तिरकी चाल, घोड्याची अडीच घरं हे सगळं बुद्धिबळात चालतं. आयुष्यात नाही.
तुम्हांला चेकमेट करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे तेवढं सांगा आम्ही आपल्या…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 17, 2023
पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वानाथन आनंद हे काल, बुधवारी ठाण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत करतानाच, बुद्धिबळाच्या भाषेत विरोधकांवर टीका केली होती. मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारणात काही तिरक्या चालीचे उंट असतात, काही अडीज घर चालणारे घोडे असतात, काही हत्ती असतात, सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. गेल्या एक वर्षापासून मलाही चेकमेट करायचा प्रयत्न अनेकजण करत आहेत, पण त्यांचे स्वप्न काही साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी जनतेच्या विश्वासाचे आणि पाठिंब्याचे बळ माझ्याकडे आहे. त्यामुळे विरोधकच सतत चितपट होत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
हेही वाचा – “शरद पवारांना ऑफर देणे हा बालिशपणा”, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका
मागच्या वर्षी आम्ही जी क्रांती केली ती पाहून लोक आम्हाला राजकारणातील ग्रँडमास्टर म्हणतात, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले होते की, आजकाल राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा तर आमच्यासारख्या नेत्यांना खरं तर बुद्धिबळ खेळण्याची फार गरज आहे. पण, एकवेळ राजकारणातील बुद्धिबळ खेळणं सोपे आहे. परंतु जगात स्वत:ची मुद्रा उमटवणे फार कठीण आहे, याची कल्पना असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा – ‘स्वत: चा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम’; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. मला राजकारणातून चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजकारण सरळ मार्गाने करायचे असते. उंटाची तिरकी चाल, घोड्याची अडीच घरे हे सगळे बुद्धिबळात चालते, आयुष्यात नाही, असे सांगतानाच, तुम्हांला चेकमेट करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे, तेवढे सांगा, आम्ही आपल्या बाजूने उभे राहू, असा शब्दही डॉ. आव्हाड यांनी दिला.