राज्यात कोरोना संकटामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामध्ये अजून अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. राज्यात पुढील ३ ते ४ दिवस ढगाळ हवामान राहणार असून गारपिटीचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासूनच तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूरमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अवकाळी पावासाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना शेतीची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.
हवामान खात्याने वर्तवल्यानुसार राज्यात पुढील ३ ते ४ दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि विदर्भातही पाऊस पडला होता. या पावसानंतर तापमानात घसरण झाली आहे. राज्या थंडी पडली असून नागरिकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. गारठा पडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वातावरणातील बदलामुळे शेतीवर मोठा परिणाम होत आहे. यामुळे शेत पीकांचे नुकसान होत आहे.
सकाळी अचानक सुरु झालेल्या पावसामुळे चंद्रपूरात नागरिकांची तारांबळ उडाली होती. चंद्रपूर जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. परंतु तूर, गहू आणि चणा या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीसुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केल आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, राज्यात विविध भागांमध्ये मुख्यतः विदर्भ आणि मराठवाड्यात पुढचे ४ ते ५ दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी.
राज्यात विविध भागांमध्ये मुख्यतः विदर्भ आणि मराठवाड्यात पुढचे ४ ते ५ दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 10, 2022