देशात अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. राज्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. (Weather Update Chance of heavy rain in Mumbai and Konkan in next 72 hours )
गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रात 106.5 टक्के पाऊस झाला होता. आता 65.4 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 15 ते 19 सप्टेंबरदरम्यान पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पश्चिमेला घाट माथ्यावर पाऊस होण्याचा, तर पूर्वेकडे कमी पाऊस होण्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.
याशिवाय 28 ते 29 सप्टेंबरदरम्यान परतीच्या पावसाच्या ढगांमुळे 3 ते 5 ऑक्टोबरपर्यंत वळीव स्वरूपात पाऊस होण्याची शक्यताही हवामानशास्त्राच्या अभ्यासकांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात आतापर्यं 61.6 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 125.7 टक्के पाऊस झाला होता.
बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा नवीन चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकतात. त्यातून कदाचित दोन्ही वेळा त्याचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होऊ शकतं. त्यांच्या वायव्ये दिशेकडे भू-भागावर होणाऱ्या मार्गक्रमणामुळे, श्रावणी पोळ्यानंतर म्हणजे शुक्रवार 15 सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 23 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण आणि नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यातील धरणसमूहात जलसंवर्धन होऊन धरणसाठा टक्केवारीतही वाढ होऊ शकते. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा: बावनकुळेंचा ‘वेस्ट इंडिजचा खेळाडू’ म्हणून उल्लेख करणारा ठाकरे गटाचा आमदार भाजपच्या निशाण्यावर )
एल निनोचा पावसावर परिणाम
प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोमुळे भारतातील हवामानावर परिणाम होत आहे. सध्या भारतातील अनेक भागांत पावसानं दडी मारली आहे. हा एल निनोचा प्रभाव आणि त्यामुळे भारताला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.