नाशिक : आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज (दि.२२) नाशिक शहरात मुक्कामी असलेले आदित्य नांदगाव मतदार संघातील मनमाड येथे मेळावा घेणार आहेत. दरम्यान, नांदगाव मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना भेटून निवेदन देण्याचा मानस व्यक्त केलाय. यावेळी मतदार संघातील कामे, हिंदुत्व, छगन भुजबळ, नवाब मलिक याच्या सोबत युती याबाबत सवाल विचारणार असल्याचं सुहास कांदे यांनी सांगितलं आहे. ‘माझं काय चुकलं’ अश्या आशयाचे पोस्टर नांदगाव मतदार संघात आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोरदार व्हायरल होत आहेत.
काय आहेत कांदे यांचे सवाल…
– पालघरमध्ये साधूंच हत्याकांड झालं, त्यातून शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या प्रतिमेला तडा गेला आपलं मौन बघून आम्हालाही गप्प राहावं लागलं
– मुंबईतील मालाड मालवणी कॉम्प्लेक्सला हिंदूद्वेष्टा टिपू सुलतानच नाव देण्यात आलं, तरी आपण शांतच
– महाविकास आघाडीतील साथीदार काँग्रेसच्या मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये स्वातंत्रवीर सावरकर यांना म्हंटल गेलं त्यावेळी आम्हला आवाज उठवला आला नाही
– मुंबईतील मालवणीत हिंदूंच पलायन होत राहील, त्यावर गृहखात्याने काहीच केलं नाही आम्ही आपल्याकडे आशेने पाहत राहिलो मात्र काहीच झालं नाही
– मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो निष्पपांचा बळी घेणारा ‘याकूब मेनन’ याच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख आणि दहशदवाद्यांशी संबंध असलेले नवाब मलिक यांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवणं, त्यांच्या सोबत युती करणं योग्य आहे का ?
– आपल्या बाळासाहेबांना टी बाळू बोलणाऱ्या, साहेबांना जेल मध्ये टाकण्याची हिम्मत करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसणं योग्य आहे का, यातून तुम्हाला यातना होत नाहीत का
मतदारसंघातील कामाबाबत केली विचारणा
– छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी अनेकदा पत्र दिली, निधी मागितला पण परंतु निधी मिळाला नाही
– मनमाड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनवण्यासाठी निधीची मागणी केली परंतु तीही मागणी अमान्य झाली
-राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी तब्बल ५० पत्र दिली परंतु त्यावर कारवाई शून्य
– मनमाड शहरातील रामगुळणा नदी याठिकाणी मुंबईच्या धर्तीवर पर्यटनस्थळ निर्माण करण्यासाठी निधी मागितला परंतु त्याकडेही दुर्लक्ष
– मनमाडसाठी अद्ययावत अभ्यासिका, वाचनालय उभारणीसाठी निधी मागितला परंतु त्यासाठी निधी मिळाला नाही.