नाशिक । शितल केवट
भाज्यांचे भाव चांगलेच वधारले आहेत. टोमॅटोचे दर तर पेट्रोलपेक्षाही महाग झाल्याने भाज्यांमधून टोमॅटो गायब झाले आहे. असे असतांना भाजीला पर्याय असणार्या कडधान्य आणि डाळीचे भाव देखील वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. डाळी आणि कडधान्याच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर तूर डाळ ही १५० रुपये एवढी झाली आहे.
एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून तूर दरात वाढ होत आहे. सध्या तुरीची डाळ खूप महाग झाली आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत. सद्यस्थित देशभरात तुरीचा पेरा घटला आहे. त्यातच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे बाजारात भाज्यांची आवक ही कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर हे वाढले आहेत. अनेक भाज्या या १०० ते १२० रुपये किलो झाल्या आहेत. टोमॅटोचे दर तर पेट्रोल पेक्षाही जास्त झाल्याने स्वयंपाक घरातून टोमॅटो गायब झाला आहे.
त्यात पावसाळ्याच्या सुरवातीला अवकाळी पावसाचा फटका देखील शेतमालाला बसल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिमाण झाला. यामुळे सध्या बाजारात भाजीपाला कमी येत असल्याने दर वाढले आहे. या सोबतच कडधान्य आणि डाळीचे देखील भाव वाढले आहे. दरम्यान, भाजीपाला महागल्याने गृहिनिंनी कडधान्य आणि डाळीचे प्रमाण रोजच्या जेवणात वाढवले होते. मात्र, तूरडाळीची आयात कमी करण्यात आली असून देशांतर्गत उत्पादन देखील घटले असल्याने आता तूरडाळीचे भाव देखील वाढले आहेत.
केंद्राकडून प्रयत्न
ग्राहकांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध व्हावी यासाठी केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी अनुदानित चणाडाळ विक्रीला सुरुवात केली. भारत दाल या ब्रँड नावाखाली चणा डाळ एक किलो पॅकसाठी 60 रुपये प्रति किलो या दराने विक्री सुरू झाली आहे. सरकारी चणा साठ्याचे चणा डाळीत रूपांतर करून ग्राहकांना परवडणार्या किमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल आहे.
एप्रिलपासून सातत्याने दरवाढ
डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत तूरडाळ घाऊक बाजारात भाव ९० रुपये किलोपर्यंत होते. तर मार्चमध्ये दर १०५ रुपये अन् एप्रिलमध्ये ११२ रुपये किलोपर्यंत गेले. आता काही ठिकाणी १३५ ते १४० रुपयांपर्यंत तूरडाळीचे भाव गेले आहे.आता तर तुरीचे भाव थेट दिडशे पार गेले आहेत.
डाळींचे दर
- हिरवे मुग १२० रू. किलो
- मसूर डाळ १२० रू.किलो
- मुगडाळ ११० रू.किलो
- चनाडाळ १३० रू.किलो
पालेभाज्यांचे आजचे दर
- टॉमेटो १४ रू. किलो
- भेंडी ८० रू. किलो
- लवंगी मिरची १६० रू. किलो
- कोथिंबीर १८० रू. किलो
- शेपू जुडी ४० रू. किलो
- मेथी जुडी ४० रू. किलो
- गवार ८० रू. किलो
- वांगी ८० रू.किलो
- लसूण १६० रू. किलो