घरमहाराष्ट्रयांचा कोणता राम खरा? रामरहिमच्या पॅरोलवरून 'सामना'तून भाजपावर हल्लाबोल

यांचा कोणता राम खरा? रामरहिमच्या पॅरोलवरून ‘सामना’तून भाजपावर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : हरयाणाच्या सिरसास्थित डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याची 40 दिवसांच्या पॅरोल रजेवर मुक्तता झाली असून सध्या हे बाबामहाराज त्याच्या बागपत जिल्ह्यातील बरनावा येथील आश्रमी मुक्कामास आहे. पॅरोलवर असताना त्याने ‘सत्संग’ सुरू केला व त्यास हरयाणातील भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे पूजन करीत असताना त्यांचे अनुयायी भलत्याच ‘रामा’च्या चरणी लीन झाले. यांचा कोणता राम खरा? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून भाजपाचा समाचार घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे केदारनाथ, बद्रीनाथ, उज्जैन, अयोध्या असे तीर्थाटन केले. अयोध्येत तर पंतप्रधानांनी दिवाळी दीपोत्सवातही भाग घेतला. रामलल्लाची आरती केली. प्रभू रामचंद्राने शब्द, विचार आणि नियमांच्या माध्यमातून रुजविलेली मूल्ये ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषवाक्याची प्रेरणा आहेत, असे पंतप्रधानांनी अयोध्येत सांगितले. मोदी यांचा ओढा पहिल्यापासून अध्यात्माकडे आहे. दुसरे म्हणजे त्यांना सत्संगाचे वेड आहे. त्यामुळे पंतप्रधानपदी असले तरी वेळात वेळ काढून ते सत्संग करीत असतात, पण भाजपमधील त्यांचे अनुयायी भलत्याच ‘सत्संगा’ला लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले व हा सत्संग फक्त राजकीय फायद्यासाठी आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

- Advertisement -

एका बाजूला पंतप्रधान मोदी अयोध्येतील नीतिमान रामाची आरती करतात. ”रामासारखी निष्ठा व नीतिमत्ता देशाला नव्या उंचीवर नेईल. रामाची मूल्ये पुढील 25 वर्षांत सर्वाधिक खडतर ध्येय साध्य करण्यासाठी लागणाऱ्या धैर्यासाठी दीपस्तंभासारखी ठरतील,” असे हितगुज करतात. मात्र त्याच वेळी भाजपचे लोक प्रभू श्रीरामास सोडून भलत्याच ‘रामा’च्या चरणी लीन होताना दिसतात, असा टोला ‘सामना’तून लगावला आहे.

सर्वच प्रकार धक्कादायक
हरयाणाच्या सिरसास्थित डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याचे नाव कुणाला माहीत नाही? हा बाबा दोन तरुणींवर बलात्कार, एका पत्रकाराची निर्घृण हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांत आजन्म जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याची 40 दिवसांच्या पॅरोलवर मुक्तता झाली असून सध्या तो बागपत जिल्ह्यातील बरनावा येथील आश्रमी मुक्कामास आहे. पॅरोलवर असताना या बाबाने ‘सत्संग’ सुरू केला व त्यास हरयाणातील भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. समाजमाध्यमांवर बाबाचा सत्संग व त्यास हजेरी लावणाऱ्या भाजपवाल्यांची धुलाई सध्या सुरू आहे. कर्नालच्या महापौर रेणुबाला गुप्तांसह उपमहापौर, भाजपचे पदाधिकारी बाबाच्या सत्संगात सामील झाले. यापैकी अनेकांनी बाबाच्या चरणी लोटांगण घालून आशीर्वाद घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हा सर्वच प्रकार अनैतिक व धक्कादायक आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

लोकांच्या मनात शंका
हरयाणा सरकारनेच रामरहीम याच्या सिरसा येथील आलिशान आश्रमात प्रचंड पोलीस दल घुसवून रामरहीम बाबाला अटक केली होती. त्यावेळी आश्रमातील गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. मोठी हिंसा व रक्तपात तेव्हा घडला होता. या बाबावर खून, बलात्कारसारखे गुन्हे होते व त्यास राजकीय पाठबळ असल्याने कोणी हात लावायला धजावत नव्हते. बाबाचा पंथ मानणारे लोक पंजाब, हरयाणात आहेत व त्या व्होट बँकेकडे पाहून बाबांच्या गुन्ह्यांकडे कानाडोळा होत असे. बाबाला अटक झाली, खटला चालला आणि आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पण जेव्हा जेव्हा पंजाब किंवा हरयाणात निवडणुका आल्या त्या-त्या वेळी बाबा रामरहीम याला हमखास पॅरोलवर बाहेर काढण्यात आले. हे एक राजकीय गौडबंगालच आहे! आताही हरयाणात पंचायत निवडणुका आहेत. शिवाय एक विधानसभा पोटनिवडणूक आहे व त्यासाठी बाबाला सत्संगासाठी पॅरोलवर मुक्त केले आहे, ही शंका लोकांच्या मनात आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

रामरहिमला भाजपाचे स्टार प्रचारक नेमा
एका वर्षात या बाबाला तीन वेळा ‘पॅरोल’ मिळाला आणि प्रत्येक वेळेला पंजाब किंवा हरयाणात कोणती ना कोणती निवडणूक होती, हा योगायोगच म्हणावा लागेल. एका वर्षात तीन वेळा ‘पॅरोल’ मिळू शकतो काय, यावर देशाचे गृहमंत्रालयच प्रकाश पाडू शकेल. कारण हरयाणाचे सन्माननीय जेलमंत्री रणजित सिंग यांनी जाहीर केले, ”शंका घेण्याचे कारण नाही. सर्वकाही नियमानेच झाले. ही एक रुटिन प्रोसिजर आहे!” मग या रुटिन प्रोसिजरचा लाभ देशाच्या तुरुंगांमध्ये खितपत पडलेल्या इतर कैद्यांना का मिळत नाही? आसाराम बापूला का मिळत नाही? निवडणुकांचा धुरळा उडू लागला की पॅरोलचा लाभ हरयाणात फक्त बाबा रामरहीम यालाच का मिळतो? मग त्यांना असे वारंवार पॅरोलवर बाहेर काढण्यापेक्षा त्यांची सर्व शिक्षा माफ करा आणि बाबाला भाजपचे स्टार प्रचारक म्हणूनच नेमून टाका!, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

हिंदुत्व आहे की मतांसाठीचा जिहाद?
देशभरात भाजपच्या या नव्या सत्संगाची चर्चा सुरू आहे. भाजपचे हे हिंदुत्व आहे की मतांसाठीचा जिहाद? की आणखीन काही? आता दोषी रामरहीम याला पुन्हा पॅरोल मिळाला आहे व अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या सत्संगात हजेरी लावल्याचे वक्तव्य तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केले. पण एरवी महिलांवरील बलात्कार, अत्याचार वगैरेंवर पोपटपंची करणारे भाजपचे कातडी पांघरलेले वाघ-वाघिणी यावर बोलायला तयार नाहीत, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -