घरताज्या घडामोडीकोण आहेत डॉ. जयंत नारळीकर?

कोण आहेत डॉ. जयंत नारळीकर?

Subscribe

भारताच्या इतिहासात वयाच्या २७ व्या वर्षी पद्यभूषण पुरस्काराचे मानकरी ठरणारे नारळीकर पहिलेच व्यक्तिमत्त्व

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या (94th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी नुकतीच ख्यातनाम साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि सामान्य वाचकांना समजेल असे विज्ञानविषयक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून डॉ. जयंत नारळीकरांची ओळख आहे. परंतु नक्की जयंत नारळीकर कोण आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊ. जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांची खगोल भौतिक शास्त्रज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक म्हणून ख्याती आहे. गणिताचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते. वाराणशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. डॉ. नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.

डॉ.जयंत नारळीकरांचे शिक्षण आणि सिद्धांत

डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांना बी.ए. एम.ए. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळाल्या. त्या काळात त्यांना रँग्लर ही पदवी मिळाली तर, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. याचदरम्यान ब्रिटिश संशोधक आणि विज्ञान कादंबरीकार फ्रेड हॉईल यांचे ते सहकारी झाले आणि अंतराळविज्ञान विश्वविज्ञान आणि ज्योतिभौतिकी यांमधील त्या दोघांचे संशोधन सर्व जगात मान्य झाले. सर फ्रेड हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो `हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध झाला. अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साम्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.

- Advertisement -

खाजगी आयुष्य ते  देशासाठीचे कार्य 

दरम्यान डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लिलावती. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला अधिक उंचावण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली. नारळीकरांनी अकरा वर्षे मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मध्ये अध्यापन केले, तर ‘सैध्दांतिक ज्योतिभौतिक विभागा’चे प्रमुख म्हणून कार्य केले. शिवाय भारतातील व परदेशातील अनेक विद्यापीठांमधील व संशोधन केंद्रामधील संशोधन कार्यात ते नेहमीच सहभागी असतात. १९८८ मध्ये खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘आयुका’ (Inter-University Center for Astronomy and Astrophysics) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली. त्यामध्ये मुलांसाठी विज्ञान संशोधन केंद्राती निर्मिती केली. आयुकाच्या माध्यमातून संशोधन व विज्ञान प्रसाराचे त्यांचे कार्य अविरतपणे सुरु आहे. डॉ. नारळीकरांना लहान मुलांविषयी विलक्षण जिव्हाळा व कौतुक असल्याने त्यांच्या प्रश्नांना स्वहस्ते उत्तरे पाठविण्यासाठी ते वेळ राखून ठेवतात. युवकांना संशोधनासाठी प्रोत्साहित  करण्यासाठी ते आजही कार्यरत आहेत.

 

- Advertisement -

मराठी विज्ञान साहित्यविश्वातील कार्य

डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम जगविख्यात आहेत, त्याचबरोबर त्यांनी मराठी साहित्यात फार मोलाची भर घातली. शिक्षित मराठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन समजावा या हेतूने डॉ. नारळीकरांनी लेखाण सुरु केले. आज ते विज्ञानकथेकडून विज्ञान कादंबरीपर्यंत आपली लिखाण करत आहेत. विज्ञानकथांना त्यांनी मराठीत चालना देण्याचं महत्त्वाचं काम केलं. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेख आणि कथा लिहिल्या. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या `यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम व्यवस्थित रचनेत अर्थपूर्ण करण्याचे कामही ते करीत आहेत. डॉ. जयंत नारळीकरांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पदाचा कारभारही सांभाळला होता. त्याचबरोबर त्यांनी संस्थेचे विश्वस्त म्हणून कार्य केले. अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे यसाठी नारळीकर नेहमी आग्रही राहिले.

पुरस्कारांचे मानकरी 

त्यांच्या महान उल्लेखनीय कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. भारताच्या इतिहासात इतक्या कमी वयात म्हणजे वयाच्या २७ व्या वर्षी पद्यभूषण पुरस्काराचे मानकरी ठरणारे नारळीकर पहिलेच व्यक्तिमत्त्व होते. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारख्या सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस चे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.


हेही वाचा – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जयंत नारळीकर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -