मुंबईः शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं धाडी टाकल्या. त्यावेळी त्यांच्या घरून काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यामुळेच एक डायरी होती. यशवंत जाधव यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती आयकर विभागानं दिली होती. त्यावरच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी भाष्य केलंय. यशवंत जाधवांच्या मातोश्री प्रकरणाला त्यांनी अफवा असल्याचं म्हटलं. अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं. अधिकृत गोष्टी बाहेर येतीलच, अफवांवर मी काही बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
राजकीय षडयंत्र चाललेलं आहे. जिथे भाजपचं सरकार नाही, तिथे या गोष्टी सुरू आहेत. न घाबरता या गोष्टींना सामोरं जावंच लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी भाजपला एक प्रकारे इशाराच दिला आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र असेल, जिथे जिथे यंत्रणा अशा मागे लागतायत, ते तोंडावर पडतायत. अफवा, बदनामीचे प्रकार, यंत्रणेचे प्रकार होतायत. ते कुठे ना कुठे तरी थांबले पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नव्हे. ही देशाचीसुद्धा संस्कृती नाहीये. विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स आतापर्यंत वाचलेला शब्द आहे तो आता बघायला मिळतोय. सरकार बनतं आणि सरकार पडतातही पण त्यानंतर जे नैराश्य येतं, यातून विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स केलं जातं, तो खूप एक धोकादायक प्रकार आहे, असंही त्यांनी सांगितलंय आहे.
प्रदूषण होणार नसेल तर प्रकल्पांना मान्यता देऊ- आदित्य ठाकरे
विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंनी नाणारवरही भाष्य केलंय. नाणार हा रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये लोकवस्ती, गावं असल्यानं तो प्रकल्प तिथून हलवलेला आहे. चांगला प्रकल्प येत असल्यास स्थानिक लोक आणि भूमिपुत्रांबरोबर चर्चा करून त्यांचे न्याय हक्क त्यांना कसे मिळतील हे बघून त्यांचा विश्वास जमवून आम्हाला पुढे जायचं आहे. कुठेही कोणाच्या विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे मी आश्वासित करतो. मला वाटतं तिथे दोन्ही बाजूंचे शिष्टमंडळ मला भेटणार आहे. दोघांशीही चर्चा करेन आणि जी काही त्यांची मतं आणि मागण्या असतील त्या मुख्यमंत्र्यांसमोर नेईन. रिफायनरीच्या प्रस्तावांवर सखोल चर्चा होत आलीय. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला हानी होणार नाही. याची काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. नाणारसाठी जागा शोधायचा प्रयत्न सुरू आहे. जिथे वाड्या वस्त्या आणि गावं नसतील अशाच जागा शोधू, कुठेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच जर तो प्रकल्प आला तर पुढे आम्ही मान्यता देऊ, असंही त्यांनी सांगितलंय.
हेही वाचाः शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात…