वंचित बहुजन नेत्यांशी चर्चा करण्यासाठी औरंगाबादमध्ये होतो त्यावेळी कन्नड येथील बंजारा समाजाचा तरुण योगेश राठोड याचा मृत्यू जेलमध्ये झाला.त्याठिकाणी जावून माहिती घेतली असता तो तरुण रक्तबंबाळ सापडला. त्याचे फोटो माझ्याजवळ आहेत. २४ तास झाले शवविच्छेदन झाले नाही. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. जेलच्या लोकांनी त्या तरुणाचा खून का केला या राज्यात काय चालले आहे कुणी अधिकार दिला तुम्हाला मारण्याचा असा संतप्त सवाल माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केला.
काय म्हणालेत भुजबळ
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील बंजारा तरुणाला जेलच्या अधिकार्यांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला. या स्थानिक मुद्याला आमदार छगन भुजबळ यांनी हात घातला. शिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचा आरोपही केला. कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांनी लिहिले म्हणून संपवण्यात आले. आज कोणीही सुरक्षित नाही. पत्रकारांनी विचार मांडले म्हणून त्यांनाही चॅनेलमधून जावे लागले आहे असा आरोपही आमदार छगन भुजबळ यांनी केला. ओबीसी महामंडळाला चार वर्षात दिले नाहीत आणि आताच ७०० कोटी देण्याचे सरकारने जाहीर केले आहेत. परंतु आत्ताच का? आताच कळवळा का आला आहे ? कशाला फसवता ओबीसींना… आधी मुलांच्या शिष्यवृत्तीचे पैसे द्या मग हा जुमला करा असा इशाराही आमदार छगन भुजबळ यांनी दिला.
पेट्रोल पंपांचा वापर पंतप्रधानांनी स्वतः च्या प्रसिध्दीसाठी केला -अजित पवार
पेट्रोल पंपाचा वापर पंतप्रधानांनी स्वतः च्या प्रसिध्दीसाठी केला असून असा प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नाही असा थेट आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केला. कन्नड येथील जाहीर सभेत अजित पवार यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. साडेचार वर्षांत या भाजप सरकारने लोकांना फक्त गाजरंच दाखवण्याचे काम केले आहे. शेतकर्यांचे कैवारी म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिले जाते. ७१ हजार कोटीची कर्जमाफी साहेबांनी करुन दाखवली आहे. पवारसाहेबांनी शेतकऱ्यांना शेतीला आधारभूत किंमत मिळवून दिली होती. परंतु आज हे लोकांना काही देत नाही नुसत्या घोषणा सुरु करण्यात हे सरकार पटाईत आहे अशी कोपरखळीही केली.
लुटारू अजून चौकीदाराला सापडले नाहीत – जयंत पाटील
भाजपचे सरकार आल्यावर बँकांवर दरोडे घालून दिवसाढवळया काही लोक निघून गेले परंतु चौकीदाराला अद्याप सापडले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केला. पाच देशात पराभवाला सामोरे गेल्यानंतर भाजप सरकार सावध झाले असून वेगवेगळी आश्वासने द्यायला लागली आहे. परंतु खोटी आश्वासने देणार्या भाजप सरकारला पुन्हा निवडून देणार नाही असा निर्णय या देशातील जनतेने घेतला असल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.