मुंबई : जालन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाने भाजपाला लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘जनरल डायर’ची उपमा दिली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाठीमाराचे आदेश दिले नाहीत तर, ते आदेश कोणी दिले? असा प्रश्न माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
एका बाजूला गद्दार आमदार माणसं पाठवून भर रस्त्यात पत्रकारांना मारहाण करवतात, गणपती बाप्पा च्या मिरवणुकीत आणि पोलीस स्टेशनमध्ये बंदूक दाखवून जनतेला धमकवतात, महिलांना शिवीगाळ करतात, त्यांची मुलं उद्योगपतींचं अपहरण करतात… आणि त्यावर कारवाई मात्र काहीच होत नाही!
पण त्याच वेळी…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 5, 2023
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी (1 सप्टेंबर 2023) पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. त्याबद्दल राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काल, सोमवारी पत्रकार परिषद घेत, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारची बाजू स्पष्ट केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल सरकारच्यावतीने माफी मागितली.
हेही वाचा – आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार? संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
तर, अजित पवार यांनी थेट विरोधकांनाच आव्हान दिले. जालन्यात जे झालं ते चुकीचे होते. मात्र सातत्याने आमच्यावर आरोप केला जातो आहे की, वरून आदेश दिले. पण हे आदेश कुणी दिले? असा प्रश्न उपस्थित करून अजित पवार म्हणाले की, आमच्या तिघांपैकी (एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार) कुणी तसे आदेश दिले असतील तर, मी राजकारणातून बाजूला होईन. पण तसे सिद्ध नाही झाले, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावे. आहे का हिंमत? असे ते म्हणाले.
याच अनुषंगाने आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले नसतील, तर दिले कोणी? सरकार चालतंय कसं? आपोआप? महाराष्ट्राने कधीही एवढा भ्रष्ट आणि निर्लज्ज कारभार पाहिला नव्हता, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा – मराठा आंदोलनावरुन बच्चू कडूंचा सरकारला इशारा; ‘आता अंत पाहू नका…’
एका बाजूला गद्दार आमदार माणसे पाठवून भर रस्त्यात पत्रकारांना मारहाण करवतात, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आणि पोलीस स्टेशनमध्ये बंदूक दाखवून जनतेला धमकवतात, महिलांना शिवीगाळ करतात, त्यांची मुले उद्योगपतींचे अपहरण करतात… आणि त्यावर कारवाई मात्र काहीच होत नाही! पण त्याच वेळी मराठा समाजातले बांधव जेव्हा स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी उपोषण करतात, तेव्हा त्यांची डोकी फोडली जातात आणि खोके सरकारमध्ये जनरल डायर अवतरतात, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.