मराठी भाषा महाराष्ट्राची भाषा आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी ही महाराष्ट्राची भाषा बनली. सध्या मराठी भाषा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात बोलली जाते. याचं भाषेचा 27 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषिकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी मराठी लोक मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवणारे कार्यक्रम साजरे करतात. 27 फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. या निमित्त विविध प्रकारची मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेचा जागर करण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
‘मराठी भाषा गौरव दिन’ का साजरा केला जातो?
मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. आपण आणि भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात येतो. पुणे येथे 27 फेब्रुवारी 1912 मध्ये जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांना लहानपणापासून लिहिण्याची आवड होती. त्यांनी बालवयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाङ्मयातील नावाजलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. 1974 मध्ये ‘नटसम्राट’ या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ त्यांना मिळाला. तसेच 1987 साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत केले. 27 फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.
भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा
2011 मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार घेतला तर भारतात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 9 कोटी इतकी आहे. सर्वाधिक बोलली जाणारी मराठी ही लोकसंख्येनुसार भारतातील तिसऱ्या आणि जगातील 10 व्या क्रमांकाची भाषा आहे. जी भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे.