महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीने हाहाकार उडविल्यामुळे विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. मे महिना संपत आला तरी या परिक्षांचे काय होणार? याबाबत राज्यात कोणतेही निश्चित धोरण ठरलेले नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांना पत्र लिहून “विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? कोरोनासारख्या महामारीच्या काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी?” असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी महाराष्ट्राच्या सन्मानीय राज्यपालांना पत्र.#लढाकोरोनाशी #विद्यार्थ्यांचामनसेआवाज #महाराष्ट्र #UniversityExams #FinalYearExam #MaharashtraFightsCorona@maha_governor pic.twitter.com/iIjLYgF0la
— Raj Thackeray (@RajThackeray) May 26, 2020
राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. “मे महिना संपत आला आहे, तरी या परीक्षांचा निर्णय होत नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. सध्याची परिस्थिती पाहता मुंबई आणि पुणे परिसरात अजून किती काळ टाळेबंदीत राहावे लागेल, याचे भाकीत कोणीच करु शकत नाही. बरं, जर टाळेबंदी शिथिल झाली तर याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही, हे आपण देखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?”
दरम्यान मुंबई विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी हे अनेक किलोमीटर प्रवास करुन त्यांच्या परीक्षाकेंद्राना पोहोचतात. आजच्या परिस्थितीत अशा हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचणेसुद्धा शक्य होणार नाही. आज कोरोनामुळे अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले आहे. किमान त्यात परिक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी त्यांच्या डोक्यावर नको, असेही राज ठाकरे यांनी सुचवले आहे.