सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सगळ्या बाबींचा विचार करत लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. तसचं, हा निर्णय घेत असताना दिरंगाई करणार नाही परंतु निर्णय घाई घाईत घेणार नाही, असंही राहुल नार्वेकर म्हणाले. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा नि:पक्षपातीपणे होईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. ( Will make decisions quickly but not hastily Assembly Speaker Rahul Narvekar said it clearly )
१६ आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय देण्यावर विनाकारण विलंब करणार नाही
– राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष@rahulnarwekar @ShivSenaUBT_ @mieknathshinde
— My Mahanagar (@mymahanagar) May 16, 2023
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. न्यायालयाने अध्यक्षांच्या अधिकारांत हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे घटनेची शिस्त कायम ठेवण्याचं काम न्यायालयाने केलं आहे. त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. आमच्याकडे अपात्रतेच्या याचिकांवर सुनावण्या होतील. सर्व नियम लागू करुन सर्वप्रथम जुलै 2022 मधला राजकीय पक्ष नेमका कोणता हे ठरवू, असं राहुल नार्वेकरांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
जुलै 2022 मध्ये राजकीय पक्ष कोणता गट होता, याची खात्री केल्यानंतर त्या पक्षाने नेमलेल्या प्रतोदला मान्यता द्यावी लागेल. ती मान्यता दिल्यानंतर मग अपात्रतेच्या संदर्भात विचार करावा लागेल. यावेळी बघावं लागेल की कोणाचा व्हीप लागू होता. तो पाळला गेला होता की नाही. त्याबाबींवर व्हिप काढणं योग्य होतं का? हे पाहावं लागेल, असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.
सुरुवातीला पक्ष कोण होता, हे ठरवलं जाईल. मग आमदार, पक्षाचा दावा करणारे नेते असं सर्वांचंच म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, असंही ते म्हणाले.
( हेही वाचा: भगतसिंह कोश्यारी पुन्हा राजभवनात! सत्तासंघर्षाबद्दल राज्यपालांना काय ‘धडे’ देणार? )
या प्रक्रियेला किती वेळ लागले यावर उत्तर देत असताना नार्वेकर म्हणाले की, वाजवी वेळ हा व्यक्तीसापेक्ष आहे. प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असेल. हे लगेच होण्यासारखं काम नाही. पण शख्य तेवढं हे प्रकरण निकाली काढण्याचा आपण प्रयत्न करु. पण कोणत्याही प्रकारची घाई गडबड केली जाणार नाही. माझ्यावर कोणाचाही दबाव चालणार नाही. कारणाशिवाय दिरंगाई केली जाणार नाही.