पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, असं नाव असलेलं पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित झालं आणि त्यावरून मोठं वादंग निर्माण झालं. मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे भाजपवर आणि या पुस्तकाचे लेखत जयभगवान गोयल यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे. तसेच, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुस्तक मागे घेण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष आता भाजपसोबत असलेले छत्रपतींचे वंशज संभाजी राजे आणि शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेकडे लागलं आहे. त्यासोबतच अद्याप या मुद्द्यावर काहीही भाष्य न केलेले उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. मात्र, यासोबतच आता राज ठाकरे आणि मनसेच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
आता मनसेची भूमिका काय असेल?
येत्या २३ जानेवारी रोजी मनसे आपला नवा झेंडा लोकांसमोर आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये झेंड्याचा पूर्ण रंग भगवा करण्यात आला आहे. तसेच, आता राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत नवी युती करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, आता ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पक्षासोबत युती करण्यासाठी इच्छुक असेल का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाहीत; लेखकाची ताठर भूमिका
पुस्तकामुळे मनसेची अडचण?
ज्या प्रमाणे मनसेच्या कोणत्या नेत्यांनी ‘भाजपसोबत युती होणार’, अशी प्रतिक्रिया दिलेली नाही, त्याचप्रमाणे भाजपशी युती होणारच नाही, अशी देखील कोणती भूमिका मनसेकडून जाहीर करण्यात आलेली नाही. शिवाय भाजपकडून देखील मनसेने भूमिकेत व्यापक बदल केल्यास युतीची शक्यता वर्तवली गेली आहे. मात्र, आता या पुस्तकामुळे मनसे भाजपसोबत जाईल की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे.