कोल्हापूर – विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. या निवडणुकांना वर्ष-दोन वर्षाचा अवधी असला तरीही भाजपाने मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढण्यासाठी पावलं उचलणार आहे. महाराष्ट्रापुरते तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते, असे संकेत शरद पवारांनी आज दिले. आज सकाळीच त्यांनी कोल्हापुरातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
हेही वाचा – महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला नेणार?, पालिकेची राज्य सरकारला विनंती
शरद पवार म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना या सगळ्यांनी येत्या निवडणुकीसाठी एकत्रित पावलं टाकावीत. काही राजकीय पक्ष, गटही महाविकास आघाडीत समावेश करावा असा विचार करत आहोत. मात्र, अजूनही निर्णय घेतलेला नाही. अनेक प्रश्नांवर आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतो. त्याचप्रमाणे निवडणुकांच्या बाबतीतही निर्णय घेतले जातील, असा विश्वास शरद पवारांनी आज व्यक्त केला.
सत्ताधाऱ्यांना सल्ला
गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अत्यंत खालच्या भाषेत टीका-टिप्पणी केली जाते. यांवर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. सत्ता हातात असेल तर जमीनीला पाय ठेवून वागायचं असतं, असा सल्ला पवारांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
हेही वाचा – मंत्रिपदाची आस नाही, पण वेळ लावू नका; मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारमधील आमदारच आतूर
…आम्हीही नाखूष
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी विराजमान झाल्यापासून ते नाखूष आहेत, असं ते सातत्याने सांगत आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार तत्काळ म्हणाले की, ते असतील नाखूष आणि आम्हीही नाखूष आहोत. अजित पवारांच्या या षटकाराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान, राज्यपालांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. याआधी राज्याला खूप चांगले राज्यपाल मिळाले, आताचे राज्यपाल अनेक वादग्रस्त वक्तव्ये करतात असंही शरद पवार म्हणाले.