राज्यात गेल्या काही दिवसांपासून हंगामी आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. यात कोरोनानंतर आता राज्यात स्वाईन फ्लू आजाराने डोकं वर काढलं आहे. यात पुण्यातील बारमती शहरात एका 52 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे पुण्यातील केईएम रुग्णालयात या महिलेचा उपचारादरम्यान 4 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूची माहिती 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले असताना जाहीर करण्यात आली. त्यामुळे प्रशासाने ही माहिती इतके दिवस का लपवून ठेवली असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बारामतीमधील अशोकनगरमधील 52 वर्षीय महिलेला 25 जुलैपासून सर्दी, पडसे, खोकला, अंगदुखीचा त्रास सुरु होता. ही महिला आजारपणापूर्वी 23 जुलैला महाबळेश्वरला पर्यटनासाठी गेली होती. त्यावेळी महिलेला संसर्ग झाल्याची माहिती बारामती तालुका अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली आहे. यानंतर महिलेने बारामती शहरातील खाजगी रुग्णालयात जाऊन विविध चाचण्या, तपासण्या केल्या. यावेळी खाजगी डॉक्टरांमार्फतही त्यांनी औषधे घेतली. पण त्यानंतरही महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागला.
बारामती शहरात तपासणी नसल्याने, पुण्यातील केईएम रुग्णालयात तिची स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात आली, 3 ऑगस्ट रोजी त्यांची स्वाईन फ्लूचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र 4 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, मात्र बारामती शहरात सध्या स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली आहे. मात्र एका मृत्यूमुळे आता बारामती शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
यामुळे सर्दी, ताप, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यासारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्यावे.