प्रेम विवाह झालेल्या पत्नीने लग्नात हुंडा दिला नाही, तसेच घर घेण्यासाठी पैसे दिले नाहीत यावरून सतत शिवीगाळ व चापटीने मारहाण करून विवाहितेचा छळ केल्याची घटना न्यू प्रकाशनगर, धामणकर नाका येथे घडली असून या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने डॉक्टर पतीसह सासरच्या मंडळीविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर पती तैयब सुबहान शेख ,सासू शेहनाज शेख ,सासरा सुबहान शेख व दीर सोहेब शेख असे गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
या घटनेतील पीडित सना शेख (२६) हि परिचारिका असल्याने तिचे डॉ.तैयब शेख (३० मुळ रा.सोनई,ता.राहुरी जि.अहमदनगर ) याच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर तिने २९ डिसेंबर २०१७ रोजी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. ते दोघेही वडिलांच्या घरीच राहू लागले. मात्र वर्षभरानंतर डॉ.तैयब याने पत्नी सना हिला हुंड्यासाठी छळ करून मारहाण करू लागला. एवढेच नव्हे तर, सासरचे मंडळी तैयब यास दुसरे लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले. तसेच तैयबला सोनई येथील घरी येण्यास प्रवृत्त करून त्याचे दुसरे लग्न करून दिले आहे.त्यामुळे पीडित सना हिने डॉ.तैयब याच्यासह सासू शेहनाज शेख ,सासरा सुबहान शेख व दीर सोहेब शेख यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. नारपोली पोलीस ठाण्यात सनाच्या सासरच्या लोकांच्या विरोधात भादंवि.कलम ४९८ ( अ ) ४९४,४०६,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारूती कारवार करीत आहे.