मुंबई : लैंगिक शोषण प्रकरणी भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रमुख कुस्तीपटूंचे राजधानी दिल्लीत आंदोलन (Wrestlers Protest) सुरू आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) पाठिंबा देतानाच भारतीय कुस्ती महासंघाला इशाराही दिला आहे. त्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) भारतातील महिला कुस्तीपटूंसोबतच्या गैरवर्तनावर आणि सर्व घटनांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याचा संदर्भ देत राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत, यामुळे भारताची जगभर बेइज्जती होते, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे.
“युनायटेड वर्ल्ड रेसलिंग” पाठोपाठ “इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी” सुद्धा कुस्तीगीर मुलींच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करते, तेव्हा भारताची जगभर बेइज्जती होते. राहुल गांधींच्या निखळ विनोदी भाषणामुळे नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 1, 2023
भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, यासाठी कुस्तीपटूंचे जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मागणीची दखल न घेतली जात नसल्याने कुस्तीपटूंनी बॅरिकेट्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना रोखताना झटापट झाली. यावेळी विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी जंतर-मंतर येथील धरणे आंदोलनाचा मंडप आणि खुर्च्याही हटवल्या.
हेही वाचा – ‘इतरांना त्रास होईल, असं वागू नका’; कुस्तीपटूंच्या आंदोलनावर मोदी सरकारची प्रतिक्रिया
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने जंतरमंतर येथे पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याचा निषेध केला. विहित मुदतीत निवडणुका न घेतल्यास भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित करण्यात येईल, असा इशाराही या सर्वोच्च संघटनेने दिला आहे. त्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) देखील या सर्व प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताला या संघटनेच्या सदस्यत्वातून वगळले जाऊ शकते.
यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’पाठोपाठ ‘इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी’ सुद्धा महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करते, तेव्हा भारताची जगभर बेइज्जती होते. राहुल गांधींच्या निखळ विनोदी भाषणामुळे नाही, असा टोला त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून लगावला आहे.