घरताज्या घडामोडीलेखक, समीक्षक गंगाधर पानतावणे

लेखक, समीक्षक गंगाधर पानतावणे

Subscribe

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे हे लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवी-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपूरमधील पाचपावली वस्तीत झाला. त्यांचे वडील विठोबा जास्त शिकलेले नव्हते, परंतु ते बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी चळवळीशी जोडलेले होते. त्यांचे आडनाव ‘पानतावणे’चा अर्थ होता पाणी गरम करणारे. गरिबीमध्ये त्यांचे जीवन व्यतीत झाले. गंगाधर यांचे डी.सी. मिशन स्कूल येथे प्राथमिक शिक्षण झाले, तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी १९४६ मध्ये बाबासाहेब जेव्हा नागपूरमध्ये आले होते तेव्हा त्यांना पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते. दुसर्‍यांदा जेव्हा बाबासाहेब नागपुरात आले तेव्हा त्यांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. १९५६ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गंगाधर पानतावणे यांनी नागपूर महाविद्यालयातून बी.ए.ची आणि एम.ए.ची पदवी मिळवली.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. १९६३ मध्ये पानतावणे नागपूरहून औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. तिथल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. औरंगाबादमध्येच त्यांनी साहित्य चळवळ सुरू केली; तिला तरुणांचा आणि विचारवंतांचा मोठा पाठिंबा मिळाला. ‘दलित साहित्याने अंधार नाकारला आहे, कलंकित भूतकाळ नाकारला आहे. मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत,’ अशा शब्दांत दलित साहित्याची पाठराखण करत पानतावणे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांची मोठी फळी घडवली. अशा या महान विचारवंताचे २७ मार्च २०१८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -