रविवारची संध्याकाळ यवतमाळमध्ये दु:खदायक ठरली. कळंब तालुक्यामध्ये झालेल्या एका भीषण अपघातामध्ये ६ जणांचा दुर्दैवी अंत झाला असून इतर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्वजण कळंब तालुत्याच्या जोडमोहा आणि आसपासच्या भागातले रहिवासी होते. जोडमोहाजवळच्या वाढोणा गावाजवळच हा दुर्दैवी अपघात झाला. अपघातातील जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
जोडमोहामध्ये बाबाराव वानखेडे नावाच्या व्यक्तीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी त्यांचे नातेवाईक एका मालवाहून गाडीमध्ये कोटेश्वरला गेले होते. मात्र तिथून परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. गाडी चालवणाऱ्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि आख्खी गाडीच पलटी झाली. त्यामुळे गाडीमध्ये बसलेले प्रवासी आतल्याआत आदळले. यामध्ये महादेव चंदनकर (५८), महादेव बावनकर (५३), किसन कळसकर (५५), अमर अत्राम (३२) आणि गणेश चिंचाळकर (५२) या पाच जणांसह आणखी दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर दोघा मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. अमर अत्रामच गाडी चालवत होता अशी माहिती देखील मिळत आहे. वाढोणा गावाजवळ एका झाडाला धडक बसल्यामुळे गाडी पलटी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
Maharashtra: 7 dead and 15 injured after a vehicle carrying them overturned in Yavatmal. More details awaited. pic.twitter.com/AG17vwAE86
— ANI (@ANI) February 16, 2020
दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या इतर ६ जणांना प्रत्यक्षदर्शी आणि आसपासच्या गावकऱ्यांनी तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.