मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले असले तरी, यावरून राजकारण अजूनही रंगले आहे. जालना येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांनी केलेल्या लाठीमारावरून महाविकास आघाडीने आक्रमक होत सरकारला धारेवर धरायचा प्रयत्न केला. तर, आता भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना असताना घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून टीका केली आहे.
हेही वाचा – संजय राऊतांच्या ‘रोखठोक’ प्रश्नांचा मुख्यमंत्री शिंदेंना करावा लागणार ‘सामना’?
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्यादरम्यान, पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यातील विविध भागांमध्ये उमटले होते. पण नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले.
THE GOVARI FILES pic.twitter.com/hvMH891Z8F
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 15, 2023
पण या लाठीमारावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. स्वातंत्र्यलढ्यात अमृतसरमध्ये ब्रिटिशांनी जसे जालियनवाला बागेचे हत्याकांड घडवले, त्याच घटनेची आठवण व्हावी, असा हा राक्षसी हल्ला होता, असे सांगत, या प्रकरणात पोलिसांपेक्षा अधिक दोष उपोषण चिरडण्याचे आदेश देणाऱ्या जनरल डायरचा आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे काय? असे ठाकरे गटाने म्हटले होते.
हेही वाचा – “सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना…”, नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका
तर आता भाजपा महाराष्ट्रने सोशल मीडियावर गोवारी हत्याकांडासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. 23 नोव्हेंबर 1994 रोजीच्या या घटनेवरून भाजपाने शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एवढी मोठी घटना घडूनही शरद पवार मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून राहिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. शिवाय, स्वतंत्र भारतातील हे जालियनवाला हत्याकांड होते, असे काही जण म्हणत असल्याचे भाजपाने या व्हिडीओत म्हटले आहे.