एका तरुणाने फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पोस्ट प्रेमाबद्दल असून फेसबुकवर वाढदिवसाचा केक, चॉकलेट आणि अंगठी यांचे फोटो देखील आत्महत्येपूर्वी काही मिनिटे अगोदर पोस्ट केलेले आहेत. त्यामुळे ही आत्महत्या प्रेम प्रेमप्रकरणातून झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. समीर एकनाथ भसे (२५), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येस कोणाला ही जबाबदार धरू नये, स्व:इच्छेने जीवन संपवत असल्याचे समीरने चिठ्ठीत नमूद केले आहे.
नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘खर्या प्रेमाचा शेवट नसतो कारण खर प्रेम कधीच संपत नाही. बदामाचे चिन्ह अशा आशयाचा मॅसेज फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करून समीरने आपलं जीवन संपवले. फेसबुकवर ‘ती’ च्या आठवणीत समीरने चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील पोस्ट केलेला आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास समीर एका दुचाकीवरून इंदोरीच्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आला. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्यानंतर मात्र काही क्षणातच त्याने पुलावरून थेट इंद्रायणी नदीत उडी घेतली. शेजारी काही अंतरावर माशे पकडणारे व्यक्ती होते, त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. परंतु, तो पर्यंत समीर हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. हे सर्व सर्वप्रथम माहिती देणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे.
दरम्यान, संबंधित घटनेची माहिती अवघ्या इंदोरी गावात पसरली असून समीरला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर एन.डी.आर.एफ.च्या पथकाला बोलवण्यात आले. त्यांनी सहा तास अथक प्रयत्न करत समीरचा मृतदेह शोधण्यास त्यांना यश आले. सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत असून त्याने केलेली आत्महत्या ही प्रेमसबंधातून असावी असा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
समीर एकनाथ भसे मी आत्महत्या करत आहे. यास कोणीही जबाबदार नाही. मी माझ्या मर्जीने आणि स्व:इच्छेने जीवन संपवत आहे. कोणाला जबाबदार धरू नये……मला जीवन संपविण्यासाठी कोणीही प्रवृत्त केले नाही. मी स्वतः हा निर्णय घेतला आहे….नाना मम्मी मला माफ करा मी तुम्हाला सोडून चाललोय, असे देखील तो पुढे म्हणाला आहे.
हेही वाचा – केवळ आडनाव ‘ठाकरे’ असून चालत नाही – अमृता फडणवीस