राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. जनतेनं भाजपच्या विचारांना नाकारलं असून महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच यापुढील निवडणुकांमध्येदेखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागतील असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालावरुन सर्वच राजकीय पक्षांकडून यशाचा दावा करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात ८५ जागांपैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १९ जागा जिंकल्या असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन देखील केलं आहे.
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालांतून महाविकास आघाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८५ पैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत, ज्यात @NCPspeaks पक्षाने जवळपास १९ जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 6, 2021
महाराष्ट्रात ११ तारखेला बंद पुकारण्यात आलाय – जयंत पाटील
महाराष्ट्रामध्ये संपुर्ण महाराष्ट्र ११ तारखेला बंद करत असताना उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेबाबत निषेध महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळमध्ये सर्वांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भाजप ज्या क्रूरतेने वागत आहे. त्यापद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन जागोजागी चिरडण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष – चंद्रकांत पाटील
राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि ३८ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. यामुळे सर्वांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात सत्तेवर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता व भाजपा विरोधी पक्ष असला तरीही तोच ट्रेंड आज कायम राहिला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : सोमय्यांचे जरंडेश्वर साखर कारखान्यातून थेट अजित पवारांना आव्हान, कारखान्याचे मालक जाहीर करा?