घरताज्या घडामोडी26/11 Mumbai Attack: मुंबई दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण; वाचा संपूर्ण थरारक...

26/11 Mumbai Attack: मुंबई दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण; वाचा संपूर्ण थरारक घटना

Subscribe

मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी संपूर्ण मुंबई हादरली होती. मुंबईतील ती काळरात्र आठवली की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. आजच्या दिवशी २००८ साली मुंबई संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे गजबजून गेली होती. मुंबई स्थिती सामान्य होती. लोकं बाजारात खरेदी करत होते, तर काही लोकं मरीन ड्राईव्हवर रोजच्याप्रमाणे समुद्रातून येणाऱ्या थंड हवेचा आनंद घेत होते. परंतु जसजशी रात्र पुढे सरत गेली मुंबईच्या काही रस्त्यांवर आरडाओरडा सुरू झाला.

याच दिवशी पाकिस्तानमधून आलेले जैश-ए-मोहम्मदचे १० दशतवाद्यांनी मुंबईत बॉम्ब हल्ला केला आणि गोळीबार केला. या दहशतवाद्यादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु हा भारताच्या इतिहासातील काळ दिवस होता. हा दिवस कोणीच विसरू शकत नाही. या दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास १६६ लोकं मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोकं जखमी झाले होते.

- Advertisement -

या हल्ल्याच्या तीन दिवसापूर्वी २३ नोव्हेंबरला कराचीहून समुद्र मार्गे एका बोटीतून हे दहशतवादी मुंबईत पोहेचले होते. ज्या बोटीतून दहशतवादी आले होते ती भारतीय होती आणि दहशतवाद्यांनी त्या बोटीवरील चार भारतीय प्रवाशांना मारून बोटीवर कब्जा केला होता. सुमारे ८ वाजता हे दहशतवादी कुलाबाजवळील कफ परेडच्या मासे बाजारात उतरले. येथून हे दहशतवादी चार गटात विभागले. त्यानंतर टॅक्सी पकडून आपाआपल्या ठिकाणी गेले.

असे म्हटले जाते की, जेव्हा दहशतवादी मासे बाजारात उतरले होते तेव्हा त्यांना पाहून मच्छिमारांना संशय आला होता. याबाबतची माहिती मच्छिमारांनी स्थानिक पोलिसांना दिली होती. परंतु पोलिसांनी याकडे जास्त लक्ष दिले नाही.

- Advertisement -

त्यानंतर रात्री ९.३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीएसएमटी स्थानकांवरील मुख्य हॉलमध्ये दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवाद्यांमध्ये एक मोहम्मद अजमल कसाब होता ज्याला फाशी देण्यात आली आहे. दोन्ही दहशतवाद्यांनी एके-४७ रायफलमधून १५ मिनिट गोळीबार केला. ज्यामध्ये ५२ लोकं मृत्यूमुखी पडले होते आणि १०० हून अधिक लोकं जखमी झाले होते.

दहशतावाद्यांचा हा गोळीबार फक्त सीएसएमटी पुरता मर्यादित नव्हता. दक्षिण मुंबईच्या लिओपोल्ट कॅफेमध्ये देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. मुंबईतील लोकप्रिय कॅफेपैकी एक लिओपोल्ट कॅफे आहे. या कॅफेमध्ये गोळीबार करून १० लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले होते. यामध्ये काहीजण परदेशी होती. १८७१ पासून सुरू असलेल्या या कॅफेच्या भिंतींवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचे निशाण अजूनही आहेत.

दरम्यान रात्री १०.३० वाजता विलेपार्लेमधील एका टॅक्सीला बॉम्बने उडवल्याचे समोर आले. ज्यामध्ये चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेच्या १५-२० मिनिटांपूर्वी बोरीबंदरमध्ये अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले होते. ज्यामध्ये टॅक्सी चालक आणि दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांमध्ये १५ लोकं जखमी झाले होते.

भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यांपैकी या हल्ल्याची कहाणी अत्यंत थरारक आणि वेदनादायक आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांना निशाणा ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट आणि नरीमन हाऊसवर देखील होता. जेव्हा ताज हॉटेलवर हल्ला झाला त्यावेळेस ४५० आणि ओबेरॉयमध्ये ३८० लोकं उपस्थितीत होते. या सर्व लोकांसाठी ती एक भयानक रात्र होती. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच २७ नोव्हेंबरला ताज हॉटेलमधील सर्व लोकांची सुटका झाल्याचे समोर आले. परंतु अजूनही काही लोकं दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत, ज्यामध्ये काही परदेशी नागरिक आहेत, अशी बातमी आली होती. दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन्ही हॉटेलला रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ), मरीन कमांडर आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या कमांडरांनी घरले होते. परंतु माध्यमांच्या लाईव्ह कव्हरेजमुळे सुरक्षा दलाच्या सर्व हालचालींची माहिती टीव्हीवरून दहशतवाद्यांना मिळत होती.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दिवस ही चकमक सुरू राहिली होती. यादरम्यान मुंबईत हल्ले झाले, आग लागली, गोळीबार झाला होता. मुंबई आणि भारतातीलच नव्हे तर जगभरातील १.२५ अब्ज लोकांच्या नजरा ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसवर खिळल्या होत्या. ज्या दिवशी ताज हॉटेलवर हल्ला झाला, त्या दिवशी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या संसदीय समितीचे अनेक सदस्य हॉटेलमध्ये थांबले होते, तरीही त्यांच्यापैकी कोणालाही इजा झाली नाही. २९ नोव्हेंबरच्या सकाळीपर्यंत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते आणि कसाब पोलिसांच्या ताब्यात होता. मुंबईतील परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आली होती, पण या दहशतवादी हल्ल्यामध्ये १६६ जणांनी आपले प्राण गमावले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -