एमआयडीसी मधील प्रोबेस एंटरप्राइजेस या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटाला मंगळवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या महाभयानक स्फोटात एकूण १२ जण मृत्युमूखी पडले तर दोनशेहून अधिक जखमी झाले होते. मात्र, स्फोटातील पीडित अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. तर चौकशी अहवाल गुलदस्त्यात आहे. फेब्रुवारी महिन्यात गुलाबी रस्ता प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डोंबिवलीत पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी डोंबिलीतील प्रदूषण बरोबर प्रोबेस स्फोट नुकसानभरपाई बाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्रयानीही सकारात्मक भूमिका घेतली हेाती. त्यामुळे प्रोबेस नुकसान भरपाई पीडितांना आशा निर्माण झाली होती. पण, त्यानंतर काही दिवसातच कोरोनाचे संकट, लॉकडाऊनमुळे हा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारकडून तरी न्याय मिळेल का? असा प्रश्न पिडीतांना पडला आहे.
ठाकरे सरकारकडून तरी न्याय मिळेल का?
प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ रेाजी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाने डोंबिवली हादरून गेली होती. कंपनी परिसरातील अनेक इमारती, कंपन्या, दुकाने, शाळा, वाहने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्रयांनी सदर स्फोटाची ठाणे जिल्हाधिकारी यांचा अध्यक्षतेखाली तज्ज्ञ लोकांची चौकशी समिती नेमून एक महिन्यात शासनास अहवाल सादर करतील तसेच सदर स्फोटात ज्या मालमत्ताधारकांचे नुकसान झाले आहे, अशांना भरपाई मिळेल असे आदेश दिले. त्यानंतर चौकशी समितीने लगेच कामाला सुरुवात केली होती. तसेच कल्याण तहसीलदार कार्यालयाने मालमत्ता नुकसान पीडितांचे पंचनामे केले होते. मात्र, अजूनही पिडीतांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यावेळी एकूण २ हजार ६६० जणांचे पंचनामे केले होते त्यात ७,४३,२७,९९० एवढी रक्कम पीडितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळण्यासाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. प्रोबेस स्फोटात मृत्युमुखी पडलेल्याना कंपनी मालकाचे नातेवाईक सोडून इतरांना फक्त २ लाख प्रत्येकी मिळाले होते तर जखमींना रुग्णालयातील खर्च करावा लागला नाही. परंतु त्यानंतरचा औषध उपचार, काहींना अपंगत्व आले अशांना पुढे स्वताच खर्च करावा लागला होता.त्यामुळे पिडीत अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचा माध्यमातून पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करीत आहे. ‘प्रोबेस कंपनीत डीस्टीलेशन शेडजवळ वेल्डींग करत असताना तेथे असलेल्या प्रोपार्जील क्लोराईडचे ज्वलनशील वाफाना वेल्डींगच्या ठिणगीमुळे आग लागली व या आगीमुळे तेथे साठविलेल्या प्रोपार्जील क्लोराईडचा दोन ते तीन टन रासायनिक साठ्याला आग लागली त्यामुळे त्याचा स्फोट झाला असे उत्तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कल्याण यांनी माहिती अधिकारात दिले आहे. तर जिल्हाधिकारी यांच्याकडून हा अहवाल गोपनीय असल्याने तसेच शासनाने जाहीर केला नसल्याने तो देता येणार नाही असे उत्तर दिले आहे. पण हा अहवाल शासनाने जनतेसाठी जाहीर का केला नाही याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ( राजू नलावडे, सचिव डोंबिवली वेलफेअर असोसिएशन)
हेही वाचा – Coronavirus Mumbai: मुंबईत मृतांचा आकडा १ हजार पार; १४३० नवे रुग्ण सापडले!