घरमुंबई८ तासांत मुंबई-ठाण्यातील ९० जोडपी विवाह बंधनात

८ तासांत मुंबई-ठाण्यातील ९० जोडपी विवाह बंधनात

Subscribe

व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत बांधली लग्नगाठ

प्रेमाची कबुली देण्याचा दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी. या दिवशी प्रेमाची कबुली देण्यासाठी प्रियकर-प्रेयसी विविध युक्त्या लढवतात, तर नाते जुळून आलेली जोडपी एकमेकांना चॉकलेट्स, फुले देऊन तसेच काही वेळेस महागडी भेटवस्तू देत तो दिवस स्मरणात राहील असा प्रयत्न करतात. काही जोडपी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत लग्नगाठ बांधण्याचाही निर्णय घेतात. मुंबई-ठाण्यातून अशा तब्बल ९० जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रजिस्टर विवाहासाठी नोंदणी केली आहे. हे ९० विवाह आज मंगळवारी सरकारी कामकाजाच्या वेळेत म्हणजे ८ तासांमध्ये होणार आहेत.

रजिस्टर विवाहासाठी एक महिना आधीच रजिस्टर कार्यालयात नोंदणी करावी लागते. विवाहासाठी जोडप्याचा वयाचा व पत्त्याचा दाखला देणारी कागदपत्रे नोंदणी कार्यालयात जमा करावी लागतात. त्यानंतर विवाहासाठी संबंधित तारखेची नोंदणी केली जाते. विवाहासाठी दोन साक्षीदारही आवश्यक असतात. ठरलेल्या तारखेला विवाह केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही दिले जाते.

- Advertisement -

रजिस्टर विवाहाव्यतिरिक्त मंदिर, विवाह हॉल किंवा अन्य धार्मिक स्थळी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विवाह करण्याचा मुहूर्त अनेक जोडपी साधतात. धार्मिक स्थळी विवाह केल्यानंतर तेथून त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र स्थानिक महापालिका कार्यालयात द्यावे लागते. दोन साक्षीदारांची कागदपत्रेही द्यावी लागतात. साक्षीदारांनी स्वाक्षरी केल्यावर पालिकेकडून विवाहाचे प्रमाणपत्र दिले जाते.

वांद्रे कुटुंब न्यायालयासमोर विवाह लावून देणार्‍यांनी आपली दुकाने थाटली आहेत. कुटुंबाचा विरोध असणारी अनेक जोडपी तेथे विवाह करतात. त्या ठिकाणी भटजीपासून मौलवीची व्यवस्था असते. जोडपी कोणत्याही धर्माची असोत त्यांचा पारंपरिक पद्धतीनुसार विवाह लावून दिला जातो. त्याचे पैसेही आकारले जातात. त्यांच्याकडून विवाहाची नोंदणी करण्याची प्रक्रियाही सांगितली जाते.

- Advertisement -

रजिस्ट्रारला घरी बोलावण्याचीही व्यवस्था
त्यानुसार मुंबईतून सुमारे १० जणांनी रजिस्टर विवाहासाठी नोंदणी केली आहे, तर उपनगरातून ३० जणांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातून ५० जणांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. रजिस्टर विवाहासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क घेतले जाते, अशी माहिती वकील परेश देसाई यांनी दिली. एखाद्या जोडप्याला घरी विवाह करायचा असल्यास रजिस्ट्रारला घरी बोलावण्याची व्यवस्थाही असते. त्याचीही नोंदणी एक महिना अगोदर करावी लागते. व्हॅलेंटाईन डेसाठी रजिस्ट्रारचेही ३ ठिकाणी बुकिंग झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -