घरमुंबईविधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये यासाठी दिल्लीतून निरोप - संजय राऊत

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये यासाठी दिल्लीतून निरोप – संजय राऊत

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले, मात्र यानंतर नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी वक्तव्य केले होते. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा म्हटले की, नाना पटोलेंच्या (Nana Patole) राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ दिली नाही. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना निवडणूक घेऊ नका यासाठी दिल्लीतून त्यावेळी निरोप होता, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. ते तिकडे शिवसेनेतून उरलेले आमदार कसे अपात्र होतील याविषयी प्रवचन करत आहेत. परंतु नार्वेकरांचा पक्षांतरचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्यांचा छंद असून पक्षांतराला उत्तेजन देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे एवढेच त्यांना सांगतो आहोत. नाहीतर महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवायला लागेल. ही धमकी नाही आहे. नाहीतर परत ते म्हणतील आम्ही धमकी दिली. कायद्याचे पालन करा हे आम्ही सांगत आहोत. परंतु पक्षांतराला उत्तेजन देऊन तुम्ही लोकशाही आणि स्वातंत्र्याची हत्या करत आहात आणि ती आम्ही होऊ देणार नाही, असे सज्जड दम संजय राऊत यांनी नार्वेकरांना दिला.

- Advertisement -

ब्रिटीशांचा कायदा लागू होत नाही
शिवसेनेचे 16 आमदार सुद्धा आमच्या अख्यारित येतील आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करू वगैरे वगैरे हे जे काही चाललं आहे त्या भुलथापा बंद करा आणि आपण खरोखरच वकील असाल तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा. तुम्ही म्हणता आम्हाला अमर्याद वेळ आहे निर्णय घेण्यासाठी. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये लोकशाहीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावे लागतात आणि वेळेचं बंधन असतं. तुम्ही असे कोण लॉर्ड फॉकलंड लागून गेले आहात. इथे ब्रिटीशांचा कायदा लागू होत नाही. हे भारतीय संविधान आहे लक्षात घ्या, असे संजय राऊत नार्वेकरांना उद्देशून म्हणाले.

इतिहासात राज्यपालांची काळ्याकुट्ट अक्षरात नोंद होईल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवडणूक घेऊ नका यासाठी दिल्लीतून त्यावेळी निरोप होते. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर अक्ष्यपदाची निवडणूक घेऊ दिली नाही, कारण मोठे राजकारण करायचे होते. आता अध्यक्षपदावर अशी व्यक्ती बसवली ज्याला लोकशाहीची चाड नाही, पक्षांतराविषयी राग नाही, पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. अशा व्यक्तीला घटनेच्या प्रमुख खुर्चीवर बसवले आहे. इतिहासात राज्यपालांची काळ्याकुट्ट अक्षरात नोंद होईल. त्यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल. आज राज्यपालांची काय अब्रु राहिली आहे? निर्लज्ज राज्यपाल म्हणून त्यांची नोंद होत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आपले पद आणि प्रतिष्ठा सांभाळावी, असा इशारा संजय राऊत यांनी नार्वेकरांना दिला.

- Advertisement -

…तर 16 आमदार अपात्र झाले असते
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने त्यांच्या राजीनाम्याचा विषय तातडीने धसास लावायला पाहिजे होता. जर मविआचा अध्यक्ष झाला असता तर त्या अध्यक्षाच्या अधिपत्याखाली 16 आमदारांना अपात्र ठरवता आले असते. पण बराच काळ उपाध्यक्ष विधानसभेचे काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली आणि त्याच काळात शिदें-फडणवीस यांनी पहिल्यांंदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -