मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी २७०० वृक्ष तोडीला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर तत्काळ क्षणाचाही विलंब न करता शुक्रवारी रात्रीच प्रशासनाने हाती कु्ऱ्हाड घेत वृक्षतोडीला सुरुवात केली आहे. वृक्षतोडीची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी आणि स्थानिकांनी प्रशासनाच्या या कृतीला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. परिणामी प्रशासन विरुद्ध पर्यावरणप्रेमी असा लढा उभा राहिला आहे. या प्रकरणी आरे परिसरात कलम १४४ म्हणजेच जमावबंदी करण्यात आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी २९ आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनकर्त्यांना बोरीवली न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने या आंदोलनकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची नावं
कपिलदीप अग्रवाल, श्रीधर ए, संदीप परब, मनोज कुमार रेड्डी, विनीत विचारे, दिव्यांग पोतदार, सिद्धार्थ सपकाळे, विजयकुमार कांबळे, कमलेश शांमतिला, नेल्सन लोपेश, आदित्य पवार, ड्वॅन लासार्डो, रुहान आलेक्सझांडर, मयुर आंग्रे, सागर गावडे, मनन देसाई, स्टीफन मिसाळ, स्वप्नील पवार, विनेश घोसाळकर, प्रशांत कांबळे, शशिकांत सोनवणे, आकाश पाटणकर, सिद्धार्थ ए, सिद्धेश घोसाळकर, श्रुती माधवन, मिमांसा सिंग, स्वप्ना स्वर, सोनाली निमले, प्रमिला भोईर.
हेही वाचा – #AareyForest : या सिलेब्रिटींनी ट्विटरवर दर्शवला तीव्र निषेध!
विरोधकांचा रोष
आरेमध्ये वृक्षतोडीला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने रोष व्यक्त केला आहे. यावेळी धनजंय मुंडे यांनी ‘हे सरकार किती आरेरावी करणार?’ असा सवाल उपस्थित केला. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “पडणारं प्रत्येक झाड सत्ताधारी पक्षाचा आमदार पाडणार” अशी खोचक टीका केली.